मुंबई - केंद्र सरकार मुंबईकडून हजारो कोटी रुपये घेऊन जाते; मात्र काहीही देत नाही. म्हणून कोस्टल रोडचे श्रेय मुंबईकरांचेच आहे; त्यावर कोणी दावा करू नये, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपला लगावला.
सागरी मार्गाच्या (कोस्टल रोड) नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंतच्या टप्प्याचे रविवारी ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 19 परवानग्या मिळवून दिल्या; त्यामुळे हे श्रेय भाजपचे आहे, असा दावा भाजप नेत्यांनी केला होता. त्याला शिवसेनेतर्फे ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे त्यांनी आभार मानले. मुंबईतील अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत; त्यांनाही परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मध्य वैतरणा प्रकल्पाप्रमाणे कोस्टल रोडही पूर्ण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपने कल्याणमध्ये मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनचा घाट घातल्यावर शिवसेनेने कोस्टल रोडचे भूमिपूजन उरकून घेतले. या कार्यक्रमाला मलबार हिल येथील आमदार मंगलप्रभात लोढा आणि स्थानिक नगरसेविका सरिता पाटील यांच्याव्यतिरिक्त भाजपच्या एकाही लोकप्रतिनिधीला निमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळे भाजपने या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, महापालिका आयुक्त अजोय मेहताही उपस्थित होते.
|