मुंबई - खरीप 2018 मध्ये कापूस लागवडीसाठी राज्यात 42 कंपन्यांच्या माध्यमातून दोन कोटी पाकिटे बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असून साधारणत: 40 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. या वर्षी प्रथमच सुमारे पाच हजार बियाण्यांचे नमुने पेरणीपूर्व तपासणीचे नियोजन केले आहे, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे सांगितले.
मंत्रालयात खरीप 2018 च्या नियोजनासाठी कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांसोबत बैठक झाली. राज्यात 41 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र असून, या खरीप हंगामासाठी 40 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात येणार आहे. त्यासाठी एक कोटी 60 लाख बियाणे पाकिटांची गरज असून, या वर्षी दोन कोटी 54 हजार पाकिटांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. यंदा बियाणे कंपन्यांनी त्यांच्या गोदामातून नमुने काढूनच विक्री करण्याच्या शासनाच्या धोरणास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शेतकरी बांधवांनी परवानगी असलेल्या वाणांचीच लागवड करावी. पूर्वहंगामी लागवड करू नये, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले.
|