मुंबई ः पश्चिम बंगालमधील खून प्रकरणातील संशयित आरोपी येथे लपला होता. त्याला अलिबाग पोलिसांच्या मदतीने खानाकुल पोलिसांनी पकडले.
राजू गोपीनाथ माझी (वय 33) असे त्याचे नाव असून, पश्चिम बंगालमधील हरिचषक येथील रहिवासी आहे. खून करून तो पसार झाला होता. खानाकुल पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल होता. तो अलिबागमध्ये असल्याची माहिती पश्चिम बंगालमधील खानाकुल पोलिसांना मिळाली होती. पोलिस उपनिरीक्षक देपंकर शाह, सहायक फौजदार संजप माल, पोलिस हवालदार नूर इस्लाम, पोलिस हवालदार, हरप्रसाद या पोलिस पथकाने तातडीने अलिबाग गाठले. अलिबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक के. डी. कोल्हे यांची भेट घेऊन त्यांना सर्व माहिती सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून के. डी. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक अक्षय जाधव, पोलिस शिपाई संपत सलगर, पोलिस शिपाई सुनील फड यांची मदत घेऊन त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
दोन दिवस शोध सुरूच होता. अखेर अलिबाग एसटी स्थानकात आरोपी असल्याची माहिती अलिबाग पोलिसांना मिळाली. त्यानुसार 25 जुलैला रात्री 9 च्या सुमारास पश्चिम बंगाल राज्यातील व अलिबागमधील पोलिसांनी छापा टाकून त्याला अटक केली.
|