अवकाळी पावसामुळे खराब कांदा बाजारात

अवकाळी पावसामुळे खराब कांदा बाजारात
अवकाळी पावसामुळे खराब कांदा बाजारात

नवी मुंबई : राज्यभरात झालेल्या अवकाळी पावसाचा कांदा पिकाला चांगलाच फटका बसला आहे. शेतात तयार अवस्थेत असताना पावसाचा तडाखा बसल्याने, कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. मंगळवारी (ता. ५) वाशी बाजार समितीत हा खराब झालेला कांदा दाखल झाला. बाजारात ११० गाड्या कांद्यांची आवक झाली; परंतु त्यापैकी ५० टक्के माल खराब असल्याने शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांनाही नुकसान सोसावे लागत आहे. 

पश्‍चिम व उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाने पुरते झोडपून काढल्यामुळे तयार शेतपिके खराब झाली. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांपाठोपाठ आता व्यापाऱ्यांनाही नुकसान सोसावे लागत आहे. मंगळवारी वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये कर्नाटकातील हुबळी, महाराष्ट्रातील नाशिक, संगमनेर, पुणे जिल्हा, जेजुरी आणि नगर भागातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली. दाखल झालेला कांदा जेव्हा गाडीतून उतरून व्यापाऱ्यांनी गोणी रिकाम्या केल्या तेव्हा बहुतांश मालाला मार लागलेला होता. काही मालाला तर पाणी सुटण्यास सुरूवात झाल्याने चिकट झाला होता. मालातून पाणी बाहेर पडत असल्याने काही माल व्यापाऱ्यांनी आला तसाच फेकून दिला. 

सोमवारी बाजारात सुमारे २०० गाड्या कांद्याची आवक झाल्यामुळे मंगळवारी एपीएमसी मार्केटमध्ये ६० रुपये किलोचा कांदा ५५ रुपये किलोवर आला. बाजारात सध्या जुन्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे; तर नवीन कांदा हा अगदी १० रुपयांपासून ते ४० रुपयांपर्यंत विकला जात आहे. 

शेतकऱ्यांकडून येणाऱ्या बहुतांश मालाला पावसाचा मार लागला आहे. काही माल पाणी सोडत असल्याने व्यापाऱ्यांना तो फेकून द्यावा लागत आहे. खरेदीनंतर सर्व रक्कम मालाच्या खपानंतर मिळत असल्याने पाणी सुटलेल्या मालामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. 
- राजू शेळके, व्यापारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com