मुंबई - डान्स बार प्रकरणात भाजपच्या दोन नेत्यांनी डान्स बार मालकांकडून काही रक्कम घेतल्याने न्यायालयात योग्य प्रकारे बाजू मांडली गेली नसल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज या संदर्भात पत्रपरिषदेत आरोप केला आहे.
डान्स बार पुन्हा सुरू करण्याचा व्यवहार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झाला, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार आणि प्रवक्त्या शायना एन. सी. यांनी डान्स बार मालकाशी या संबंधातला व्यवहार केला, न्यायालयात युक्तिवाद करताना बाजू कमकुवत ठेवण्याचे ठरले होते. सरकारने बाजू नीट न मांडल्याने डान्स बारवरील बंदी उठली, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज सकाळपासून सुरू ठेवला आहे.
आरोप विकृत मानसिकतेतून - शायना एनसी
महिलांचे हक्क तसेच त्यांच्या आत्मसन्मानासाठी सातत्याने लढत असताना डान्स बार मालकांशी छुपा व्यवहार केला, असा आरोप करणे विकृत मानसिकतेचे लक्षण आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजप प्रवक्त्या शायना एनसी यांनी व्यक्त केली. आम्ही डान्स बार विरोधात सातत्याने आंदोलने केली. तरीही माझ्यावर हा आरोप करणे व्यथित करणारे आहे, असेही त्या म्हणाल्या. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही मलिक यांच्या आरोपांचा समाचार घेतला.
|