ऐरोलीतील पाण्याचे डबके धोकादायक!

नेव्हा भक्ती पार्कच्या बाजूला असलेले पाण्याचे डबके
नेव्हा भक्ती पार्कच्या बाजूला असलेले पाण्याचे डबके

नवी मुंबई : ऐरोली नाट्यगृहाच्या ठिकाणी पाच वर्षांपूर्वी भूमिपूजन करून त्या ठिकाणी प्लिन्थ करण्यासाठी खोदकाम करून ठेवले आहे. मात्र ८ मीटरपर्यंत करण्यात आलेल्या खोदकामामध्ये पाणी साचलेले असल्यामुळे या डबक्‍यात मागील आठवड्यात एका महिलेने आत्महत्या केली. तर एमआयडीसीच्या भूखंडावरील ऐरोली नॉलेज पार्क परिसरातील नेव्हा भक्ती पार्क या ठिकाणी असणाऱ्या या पाण्याच्या डबक्‍यात पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाची बुडून मृत्यू होण्याची घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली आहे. त्यामुळे ऐरोलीत खोदण्यात आलेले पाण्याचे डबके जीवघेणे झाले असून, या डबक्‍यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

एमआयडीसी तसेच पालिका प्रशासनाने या डबक्‍यांच्या ठिकाणी फलक लावण्यापलीकडे कोणतीच जबाबदारी न घेतल्यामुळे पाण्याचे डबकी धोकादायक बनली आहेत. नवी मुंबई व ठाणे शहराच्या वेशीवर असणाऱ्या पटनी कंपनीसमोरील एमआयडीसीच्या भूखंडावर पाण्याचे डबके आहे. या डबक्‍यामध्ये दरवर्षी किमान एक ते दोन जणांचा बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडतात. तीन वर्षांपूर्वी या तलावात विटावा येथे राहत असणाऱ्या अभियांत्रिकीमध्ये दुसऱ्या वर्षाला शिकत असणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला होता. तर दोन वर्षांपूर्वी ऐरोलीतील श्रीराम विद्यालयात शिकत आसणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे एमआयडीसीने या ठिकाणी फलक लावला असून, पाण्यामध्ये उतरू नये, असे आवाहन केले आहे.

तर यावर्षी एमआयडीसीच्या भूखंडावरील नेव्हा भक्ती पार्कच्या बाजूला असणाऱ्या डबक्‍यामध्ये बारावीला शिकत असणाऱ्या एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू होण्याची घटना घडली. त्याचप्रमाणे ऐरोली नाट्यगृहाच्या भूखंडासाठी खोदून ठेवण्यात आलेल्या ठिकाणी पावसामुळे पाणी साचून राहिले आहे. दीड वर्षापूर्वी एका महिलेने आपल्या सहा वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केली होती. तर गेल्याच आठवड्यात या नाट्यगृहाच्या भूखंडामध्ये दुसऱ्यांदा एका महिलेने आत्महत्या केली आहे. असे असतानाही पालिका प्रशासनाकडून या धोकादायक ठरत असलेल्या डबक्‍यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ऐरोलीमधील पाण्याचे डबके जीवघेणे ठरत आहे.

संकल्पित दिघा रेल्वे स्टेशनच्या बाजूला असणाऱ्या एमआयडीसीच्या भूखंडाचा विषय न्यायप्रविष्ट आहे. या भूखंडावर असणाऱ्या तलावाचा निर्णय घेण्यात येणार आहे. तरी या पाण्याच्या तलावामध्ये कोणी उतरू नये यासाठी फलकदेखील लावण्यात आलेला आहे.
- एम. एस. कलकुटकी, कार्यकारी अंभियता, एमआयडीसी.

ऐरोली नाट्यगृह ज्या ठिकाणी बनवण्यात येणार आहे, त्या ठिकाणी पाण्यामध्ये कोणी उतरू नये. यासाठी पाण्याची खोली दर्शवण्यात आली असून, प्रवेश निषिद्ध असल्याचा फलकदेखील लावण्यात आला आहे. तर भूखंडाच्या बाजूला बॅरिकॅडस्‌देखील लावण्यात आलेल्या आहेत.
- गिरीश गुमास्ते, कार्यकारी अभियंता, ऐरोली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com