मुंबई - आपल्या इच्छेविरोधात लग्न करणाऱ्या मुलीची पित्याने हत्या केल्याची घटना घाटकोपर येथे घडली. एकाच गोत्रात विवाह न करण्याची परंपरा राखण्यासाठी त्याने हे कृत्य केले. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत पित्याला बेड्या ठोकल्या.
मीनाक्षी चौरसिया (20) हिचे ब्रिजेश चौरसिया नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. हे संबंध तिचा पिता राजकुमार चौरसिया याला मान्य नव्हते. त्याने दोन वेळा मीनाक्षीचे लग्न इतर ठिकाणी जमवले होते; परंतु तिने दोन्ही वेळा नकार दिला होता. तिने ब्रिजेशशी विवाह केल्यामुळे संतापलेल्या चौरसिया याने शनिवारी (ता. 13) मीनाक्षीला कपडे खरेदी करण्यासाठी पैसे देण्याच्या बहाण्याने भेटण्यासाठी बोलावले. ती आल्यावर त्याने हातातील पैसे जमिनीवर पाडले. ते पैसे उचलण्यासाठी वाकलेल्या मीनाक्षीच्या मानेवर त्याने धारदार शस्त्राने अनेक वार केले.
मूळचा उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील रहिवासी असलेल्या राजकुमार चौरसिया याची माटुंगा येथे पानाची टपरी आहे. चौरसिया व मीनाक्षीचा पती ब्रिजेश हे एकाच गावातील आहेत. एकाच गावातील व्यक्ती एकाच गोत्राचे असल्यामुळे असे विवाह करण्याची परंपरा नाही. त्यामुळे चौरसिया याचा मीनाक्षी आणि ब्रिजेशच्या विवाहाला विरोध होता. या विरोधाला न जुमानता त्यांनी लग्न केले होते.
|