राष्ट्रीय कर्तव्य बजावूनही सुट्टीपासून वंचित

रविवारी ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालय येथील मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले.
रविवारी ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालय येथील मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले.

ठाणे : जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशात नेहमीच कुठे ना कुठे निवडणुका असतात. निवडणुकीचे कार्य म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य असते. तेव्हा, मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी सर्वांनाच पगारी सुट्टी दिली जाते. देशहिताच्या या कामासाठी जुंपण्यात आलेले कर्मचारी व अधिकारी कोणतीही सबब न सांगता आपले कर्तव्य इमानेइतबारे बजावत असतात; मात्र मतदानासाठी राबराब राबूनही मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी मिळत नसल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.

राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता २१ ऑक्‍टोबरला मतदान होत आहे. लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार, अत्यावश्‍यक सेवा देणारी दुकाने व आस्थापने वगळून सर्व दुकाने, आस्थापने, कारखाना कामगार, कर्मचारी व अधिकारी यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्याकरिता पगारी सुट्टी देण्यात येते. सदर सुट्टीच्या दिवसाचा पगार कपात करण्यात येत नाही. या आदेशाचे पालन न झाल्यास कामगार किंवा कामगार संघटना संबंधित कामगार उपआयुक्त यांच्या कार्यालयाशी किंवा उप संचालक, औद्योगिक सुरक्षा संचालनालय, ठाणे यांच्याकडे दाद मागता येते. 

दुसरीकडे मतदान प्रक्रिया पार पाडणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना अनेक दिवस राबूनही मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अनेकांना दूरचे केंद्र मिळाल्याने ओढाताण होते. प्रवासाचा, कामाचा शीण येत असल्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावर रुजू होताना ताण येतो. जे कर्मचारी निवडणुकीचे काम नाकारतात, त्यांना मतदानाची सुट्टी मिळते; मात्र कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना ना मतदानाची ना मतदानानंतर सुट्टी मिळते. तेव्हा, माणुसकीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याबाबत विचारविमर्श करावा, अशी मागणी होत आहे. 

दूरच्या केंद्रात ड्युटी लागल्यास आदल्या दिवशी मुक्कामाला जावे लागते. दिवसभर मतदानाला येणाऱ्या मतदाराला हाताळून कर्मचारी मेटाकुटीला येतात. तसेच मतदानाच्या पेट्या जमा करेपर्यंत उशीर होतो. त्यानंतर रात्री उशिरा घरी जाऊन पुन्हा कामावर येणे खूप त्रासदायक असते. काही जणांना तर वाहनाची सोय नसेल, तर तो दिवसही मतदान केंद्रस्थानीच काढावा लागतो. त्यामुळे निवडणूक कर्मचारी व अधिकाऱ्यांना मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी द्यावी. 
- भरत मोरे, मतदान कर्मचारी

निवडणूक प्रक्रिया हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जाते. तेव्हा, कर्मचाऱ्यांच्या सुट्टीबाबत आयोगच निर्णय घेऊ शकतो.
- राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com