शेतकऱ्यांना आठवडाभरात धनादेशाचे वाटप करा : दीपक केसरकर 

शहापूर - अधिकाऱ्यांशी चर्चा करताना माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर
शहापूर - अधिकाऱ्यांशी चर्चा करताना माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर

खर्डी : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊनही संबंधित सरकारी अधिकाऱ्यांनी पंचनामे सादर न केल्याने शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. शिवसेनेने शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी, या हेतूने शहापूर तालुक्‍याच्या ठिकाणी मदत केंद्र उभारली आहेत. तालुक्‍यातील या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून तातडीने भरपाई मिळावी, यासाठी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली शहापूर पंचायत समिती सभापती दालनामध्ये आज तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी यांची आढावा बैठक झाली. या वेळी सात दिवसांत शेतकऱ्यांना 2017-18 व 2019-20 ची नुकसानभरपाई धनादेशाद्वारे द्यावी, अशा सूचना महसूल व कृषी अधिकारी यांना केल्या आहेत. 

नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळावी, यासाठी सरकारच्या महसूल, कृषी आणि पंचायत समिती या यंत्रणांच्या माध्यमातून पंचनामे करण्यात येत आहेत. मात्र, संथगतीने सुरू असलेल्या या कार्यवाहीमुळे भरपाई कधी मिळणार या चिंतेने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

शहापूर पंचायत समिती उपसभापती यांच्या दालनात तालुका मदत केंद्र सुरू करण्यात आले असून येत्या आठ दिवसांत पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच संबंधित सरकारी यंत्रणांकडून याबाबत पाठपुरावा करावा, आशा सूचना या वेळी अधिकाऱ्यांना केसरकर यांनी दिल्या.

या बैठकीला ठाणे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, आमदार शांताराम मोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा दीपाली पाटील, बांधकाम सभापती वैशाली चंदे, कृषी सभापती किशोर जाधव, नायब तहसीलदार एस. मेंगाळ व तालुका कृषी अधिकारी बी. जे. जायभावे, तालुकाप्रमुख मारुती धिर्डे, किसन भांडे, काशिनाथ तिवरे, सभापती पद्माकर वेखंडे, जिल्हापरिषद सदस्य काशिनाथ पष्टे, राजेंद्र विशे, पंचायत समिती सदस्य आदी उपस्थित होते. 

यावर्षीची भरपाई कोणत्या वर्षी? 
शेतकऱ्यांना 2017-18 ची मदत दोन वर्षे झाली तरी मिळाली नाही. तर यावर्षी अवकाळी पावसामुळे पिकाची पूर्ण नासाडी होऊन शेतकऱ्यांची सर्व मेहनत वाया गेली आहे. त्यांच्या हाताशी काहीच न लागल्याने उपासमारीची वेळ आली असून या वर्षीची नुकसानभरपाई कोणत्या वर्षी मिळेल, या संभ्रमात तालुक्‍यातील शेतकरी आहेत. 

कृषी व महसूल विभाग यांच्यात समन्वय नसल्याने 2017-18 साली 26 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना या विभागाने फक्त 13 हजार शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केल्याचे या चर्चेदरम्यान समोर आले. या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर संबंधित सचिवांशी बोलून कारवाई करण्याची मागणी करणार आहे. 
- दीपक केसरकर, 
माजी गृहराज्यमंत्री 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com