मुंबई - राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती राज्य शासन करीत असून, यापुढे प्रात्यक्षिक परीक्षांच्या शुल्काची प्रतिपूर्तीही शासन करणार आहे. पुढील 15 दिवसांत ही प्रतिपूर्ती करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी आज दिली. विधानसभेत राज्यातील दुष्काळी भागातील शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करणेबाबत भीमराव धोंडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना शेलार बोलत होते.
शेलार म्हणाले, शुल्क प्रतिपूर्तीसाठी सोलापूर जिल्ह्यातील पात्र असलेल्या 972 माध्यमिक शाळांपैकी 518 शाळांचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांच्याकडे प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील 77 व मंगळवेढा तालुक्यातील 34 शाळांचा समावेश आहे. 10 वीच्या 24 हजार 138, तर 12वीच्या 12 हजार 610 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त असून, शालेय शिक्षण 8.50 कोटींची, तर समाज कल्याण विभाग 48 लाखांची प्रतिपूर्ती पुढील 15 दिवसांत करून विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्यात येईल. दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केलेले तालुके व महसुली मंडळांतील ज्या शाळांचे प्रस्ताव आले नाहीत, अशा शाळांकडून प्रस्ताव मागविण्यात येणार असल्याची माहितीही शेलार यांनी दिली.
|