बदलत्या वातावरणामुळे डासांची संख्या वाढली

बदलत्या वातावरणामुळे डासांची संख्या वाढली
बदलत्या वातावरणामुळे डासांची संख्या वाढली

नवी मुंबई : ऑक्‍टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचा जोर; तर कधी उन्हाचा तडाका, त्यात वातावरणबदल यामुळे नवी मुंबईत रोगराईचे प्रमाण वाढले असून, डासांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सायंकाळी सात वाजल्यानंतर डास आक्रमक होत असल्याने फेरफटका मारायला निघालेल्या नागरिकांना घरी परतावे लागत आहे. यावर प्रशासनाकडून कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याने, दिवसेंदिवस रोगराईमध्ये वाढ होत आहे.

‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’मध्ये घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात देशातील सर्वोत्तम शहराचा बहुमान संपादन केल्यानंतर ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ला सामोरे जाताना स्वच्छतेचा संदेश जनमानसात व्यापक स्वरूपात प्रसारित व्हावा, याकरिता प्रशासन आक्रमक झाले असून, त्याकरिता विविध उपाययोजना सुरू आहेत. मात्र, यातील अनेक योजना कागदावर; तर काही योजना सोशल मीडियावरच आहेत. तर प्रशासनाचे उपक्रम प्रसिद्धिमाध्यमाच्या रूपातून समोर यावेत, यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. या सर्व बाबबीत प्रशासन व्यस्त असल्याने नागरिक मात्र रोगराईच्या खाईत लोटले जात आहे. ताप, डोकेदुखी, अंगदुखी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या शहरात झपाट्याने वाढत असतानाच आता डेंगी व मलेरियाने शिरकाव केला. सायंकाळी सातनंतर डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्याचा अनेकांना फटका बसत आहेत. 

शहराला एकीकडे पाम बीच खाडीचा किनारा लाभला असला, तरी या ठिकाणी नागरिकांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. सायंकाळी ८ नंतर त्या मार्गावर असलेल्या गार्डनमध्ये अथवा रात्री फेरफटका मारायला बाहेर निघालेल्यांना या प्रकारामुळे घरात परतावे लागते. एकाच वेळी अनेक डास चावत असल्याने नागरिकांना अस्वस्थ वाटू लागते. त्याचबरोबर शहरात मोठ्या प्रमाणात असलेल्या गार्डनमध्येही तीच परिस्थिती आहे. अनेक नागरिक आपल्या परिवारासह सायंकाळी ८ नंतर मुलांना घेऊन गार्डनमध्ये येतात. मुले खेळत असतात; मात्र त्यांच्या पालकांनी एखाद्या ठिकाणी बसायचे म्हटले तर त्यांना डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. याचा त्रास अनेक मुलांनाही होत असल्याने त्यांच्यात आजाराचे प्रमाण वाढले आहे. 

फेरफटका मारणाऱ्यांची संख्या रोडावली
खाडीकिनारी असणाऱ्या गावांना सध्या डासांनी चांगलेच घेरले आहे. ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, जुहूगाव, वाशी व पाम बीच मार्गावर फेरफटका मारण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. मात्र, या डास वाढल्याने सध्या ही संख्या रोडावली आहे. कोपरखैरणे परिसरात तर सध्या मोठ्या प्रमाणात डास वाढले आहेत. त्यात अनेक ठिकाणी बांधकामे ही सुरू असल्याने ठिकठिकाणी पडलेल्या राडारोड्याने डास उत्त्पत्ती होत आहेत.

वातावरण बदलामुळे डास वाढले आहेत. खाडी किनारी डास वाढल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे शक्‍य होत नाही. मात्र, शहरात अनेक ठिकाणी धूर-धुरीकरण करून डासांची संख्या आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. 
-डॉ. बाळासाहेब सोनवणे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, नवी मुंबई महापालिका.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com