शिक्षणात मानवी मूल्यांचा अंतर्भाव आवश्‍यक - दलाई लामा

मुंबई - दलाई लामा मार्गदर्शन करताना.
मुंबई - दलाई लामा मार्गदर्शन करताना.

मुंबई - भारतीय संस्कृतीतील करुणा, अहिंसा या मूल्यांमुळे अनेक प्रश्‍न सोडवता येतात. म्हणून शिक्षण पद्धतीत मानवी मूल्यांचा समावेश केला पाहिजे, असे प्रतिपादन जागतिक बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी केले.

मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाच्या वतीने कलिना कॅम्पस येथे ‘द कन्सेप्ट ऑफ मैत्री (मेत्ता) इन बुद्धिझम’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्‌घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मैत्री, करुणा आणि प्रेमभावना यांचा अंगीकार करून अनेक मोठ्या समस्या सोडवता येतील. कोणत्याही समस्येचे निराकरण हातात शस्त्रे घेऊन होऊ शकत नाही.

शस्त्रांमुळे जगाने मोठी किंमत मोजली आहे, असे ते म्हणाले. समस्यांचे निराकरण करण्यासाठी संवादाच्या मार्गाचा वापर करणे महत्त्वाचे आहे. विसंवादामुळे प्रश्‍नांची उकल कठीण होते, असे त्यांनी सांगितले. 

विसाव्या शतकात लोकांना शांती हवी आहे. हिंसेला लोक कंटाळले आहेत. त्यामुळे आपण एकमेकांचा आदर ठेवून, एकत्वाची भावना दृढ केली पाहिजे. तशा पद्धतीच्या मूल्यांचा अंतर्भाव शिक्षणात गरजेचा आहे, असे दलाई लामा म्हणाले. या आंतरराष्ट्रीय परिषदेत अनेक मान्यवर आणि शिक्षणतज्ज्ञ बौद्धधर्मातील मैत्री या संकल्पेवर विचार मांडणार आहेत.

एकोप्याची गरज
अहिंसा आणि करुणेमुळे क्रोधावर सहजपणे मात करता येते, असे दलाई लामा यांनी नमूद केले. एकोप्यासाठी धर्माकडे पाहणे गरजेचे आहे. धर्माच्या नावावर लोकांची विभागणी स्वीकारार्ह नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले. राग, क्रोध आपल्या सुखी भावनेला नष्ट करतात. त्यामुळे त्यांना बाजूला ठेवून प्रेमभावनेने वागायला शिकले पाहिजे. शत्रूलाही प्रेमभावनेने सामोरे गेले पाहिजे, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com