मुंबई - कंत्राटी कामगारांना समान वेतन द्यावे व त्यांना सेवेत कायम करावे, या मागणीसाठी पूर्वीच्या राज्य वीज मंडळातील सुमारे 32 हजार कंत्राटी कामगार मे महिन्यात संपावर जाणार आहेत. कायम कर्मचारीही त्यांच्या समर्थनासाठी संपावर जाणार असल्याने वीज कंपन्यांचे काम ठप्प होण्याची भीती आहे.
महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या कंपन्यांत 20 वर्षांपासून हजारो कंत्राटी कामगारांची नियुक्ती झाली आहे. त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन न देता दरमहा पाच ते सहा हजार रुपये मिळतात. तरीही वीजनिर्मिती व्यवस्था सुरळीत राहावी, म्हणून हे कंत्राटी कामगार राबत असतात. त्यांना समान वेतन देण्याबाबत सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही. समितीच्या अध्यक्षाचे पदही रिक्त आहे. समान वेतनाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचेही पालन केले जात नाही, अशी माहिती एमएसईबी वर्कर्स युनियन पॉवर फ्रंटने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
|