मुंबई - राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यास अखेर शिक्षण विभागाला मुहूर्त मिळाला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी सोमवारपासून (ता. 22) सुरू होईल.
यंदा अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाचे दहावे वर्ष असूनही या प्रक्रियेतही गोंधळ होत आहे. हा गोंधळ कमी करण्यासाठी विद्यार्थी दहावीत असतानाच शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून ऑनलाइन प्रवेशाची तयारी करून घेण्यात येते. दर वर्षी मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात महाविद्यालयांना नोंदणी करण्यासाठी संकेतस्थळ खुले करून देण्यात येते; परंतु यंदा एप्रिलचा तिसरा आठवडा उलटला तरी नोंदणी सुरू झाली नव्हती. या कारणामुळे विलंब होऊ नये यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, तसेच माहिती पुस्तिका प्रसिद्ध केल्या आहेत.
महाविद्यालयांना नोंदणी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उपसंचालक कार्यालयाने सोमवारपासून उपलब्ध जागा, नवीन महाविद्यालयांची नोंदणी आदींसाठी संकेतस्थळ खुले करून देण्याचे ठरवले आहे. महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याची संधी देण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील अर्ज भरून घेण्यात येतील.
|