अभियांत्रिकी प्रवेश दहा दिवस लांबणार

Online-Admission
Online-Admission

प्रवेशप्रक्रियेसाठी "डीटीई' मदतीला; विद्यार्थ्यांची "सीईटी' सेलकडे धाव
मुंबई - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेची संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय प्रवेश नियामक प्राधिकरणाने घेतल्याने प्रवेशाची प्रक्रिया पुन्हा दहा दिवस लांबणीवर गेली आहे. आजवर अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया राबविण्याचा अनुभव असलेले तंत्रशिक्षण संचालनालय (डीटीई) ही प्रक्रिया सुरळीतपणे राबविण्यासाठी धावून आले असून, लवकरच प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी आणि अर्ज भरावा लागणार आहे.

"सीईटी' कक्षामार्फत पोर्टलवर नोंदणी व "सीईटी' पोर्टलवर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी राज्यातील सेतू केंद्रांवर करण्यात येत होती. अर्ज भरण्यास सुरवात केल्यामुळे सर्व्हरवरील भार मोठ्या प्रमाणात वाढला, त्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू होती.

यातच प्रवेशप्रक्रिया उशिरा सुरू झाल्याने प्रवेशप्रक्रियेसाठी केवळ पाच दिवसांचा कालावधी मिळाला होता. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत वारंवार बिघाड होऊ लागल्याने आणि सेतू सुविधा केंद्रांवर विद्यार्थी आणि पालकांची प्रचंड गर्दी होत होती, यामुळे पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण होते. त्यामुळे प्रवेश नियामक मंडळाने तातडीने सर्व प्रक्रियाच रद्द केली. नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून (ता. 24) सुरू होणार आहे. मात्र, पुन्हा प्रवेशप्रक्रिया लांबणीवर जाणार आहे.

"डीटीई'मार्फत यापूर्वी सर्व पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश केले जात होते; परंतु व्यावसायिक शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाचे व शुल्काचे विनियमन करण्यासाठी कायदा करण्यात आला. या कायद्यानुसार प्रवेश नियामक प्राधिकरण आणि सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाची स्थापना झाली. त्यानंतरही काही वर्षे हे प्रवेश "डीटीई'मार्फत केले जात होते. या वर्षी प्रथमच "सीईटी' सेलने सर्व प्रवेशाची जबाबदारी घेत खासगी एजन्सी आणि सेतू केंद्रासाठी एका खासगी एजन्सीला काम दिले होते. मात्र, या कंपन्यांनी समाधानकारक काम न केल्याने अखेर विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप सहन करावा लागला. अचानकपणे प्रक्रिया बंद केल्याने विद्यार्थी आणि पालकांनी शुक्रवारी फोर्ट येथील "सीईटी' कार्यालयात गर्दी केली होती. विद्यार्थी आणि पालकांच्या प्रश्‍नांची उत्तरे देण्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.

अर्जासोबत नव्याने शुल्कही
यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरला आहे आणि त्याचे शुल्क भरले आहे, त्या विद्यार्थ्यांना त्यांचे पैसे परत देण्यात येणार आहेत. यापूर्वीची प्रक्रिया रद्द झाल्याने आता पुन्हा नव्याने विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरावा लागणार आहे. त्यानुसार अर्जासोबत नव्याने शुल्कही भरावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com