स्त्रीत्व ही निसर्गाची देणगी

स्त्रीत्व ही निसर्गाची देणगी
स्त्रीत्व ही निसर्गाची देणगी

नवी मुंबई : "स्त्रीत्व ही निसर्गाने दिलेली देणगी असून, मानव वंश पुढे नेण्याची शक्ती स्त्रीमध्ये असते. निसर्गाने दिलेल्या या देणगीची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे,' असे मत येरळा मेडिकल कॉलेजच्या स्त्री-रोगतज्ज्ञ आकांक्षा नाईक यांनी व्यक्त केले. त्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सीबीडी बेलापूर येथे "सकाळ' आयोजित "कळी उमलताना' या कार्यक्रमात बोलत होत्या. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा यादव, शिक्षिका प्रतिभा भादलीकर, वर्षा राडीग्ज, राजश्री गायकवाड, अपर्णा तांडेल, कविता शेंडगे, शारदा माळी यांच्यासह मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी उपस्थित होत्या. 

वयात येणाऱ्या मुलीच्या मनात मासिक पाळीविषयी अनेक शंका असतात. या शंकांचे समाधान कसे करावे, याविषयी मनात नानाविविध प्रश्‍न निर्माण होतात. या शंका दूर करण्यासाठी शनिवारी (ता. 19) "सकाळ'तर्फे "कळी उमलताना' या कार्यक्रमाचे आयोजन पीपल्स एज्युकेशन स्कूलमध्ये शालेय विद्यार्थिनींसाठी व महिला पालकांसाठी करण्यात आले होते. या वेळी त्यांनी मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेची काय काळजी घ्यावी, आहार कसा असावा? याचे सोप्या पद्धतीने विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. पाळी नियमित येणे हे निरोगीपणाचे लक्षण आहे. 

अनियमितता येऊ नये म्हणून काय काळजी घेणे गरजेचे आहे? मासिक पाळी हा विषय महिलांच्या आरोग्याशी संबंधित आणि महत्त्वाचा विषय आहे; मात्र या महत्त्वाच्या विषयावर वयात येणाऱ्या मुलींचे प्रबोधन होणे आवश्‍यक असल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले. मासिक पाळीदरम्यान घेण्यात येणारी काळजी, आहार आदींबाबतची माहिती तसेच पुढील संभाव्य धोक्‍यापासून कसा बचाव करायचा? याबाबतदेखील मार्गदर्शन या वेळी करण्यात आले. ज्याप्रमाणे कळीचे रूपांतर फुलात होते, तसेच मुलींचेही स्त्रीरूपात होते. त्यादरम्यान मुलीमध्ये शारीरिक व मानसिक बदल होतात. ज्या वेळी मुलगी नऊ किंवा 10 वर्षांची होते, तेव्हा तिला मासिक पाळी सुरू होते. त्याच वेळी तिच्यातील शारीरिक बदल आपोआप घडत जातात. त्यानुसार शरीरातील हार्मोन्सही बदलतात. विशेष म्हणजे आजकालच्या नव्या पिढीमुळे मुलींना लहान वयातच मासिक पाळी सुरू होण्याची समस्या पालकांपुढे उभी राहिली आहे. 

भेसळयुक्त खाण्यामुळे शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होत जातो. त्यात मासिक पाळीदरम्यान आहार, काळजी व स्वच्छता घेणे महत्त्वाचे असून, त्या वेळी कोणतेही दडपण येऊ देऊ नये. पूर्वी कपडा वापरला जात होता; मात्र आता सॅनिटरी नॅपकिन वापरले जातात; मात्र पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून स्वच्छ कापड वापरणे योग्य असून, बाजारात नॅपकिनऐवजी मिळणारे कापड वापरणे अधिक चांगले असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी उपस्थितांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देऊन त्यांना आरोग्याविषयी सल्लादेखील दिला. महिलांनी आपल्या पाळीबाबत येणाऱ्या समस्यांबाबत प्रश्‍न विचारून कोणती उपचार पद्धती व औषधे घ्यावीत याबाबत विचारणादेखील केली. 

"सकाळ' आयोजित कळी उमलताना हा कार्यक्रम खरोखरच खूप प्रबोधनात्मक असून, वयात येणाऱ्या मुलींसाठी हा स्तुत्य उपक्रम असल्याने असे कार्यक्रम इतर शाळांमध्येही राबविणे गरजेचे आहे. "सकाळ' समूहाच्या या उपक्रमाबाबत जेवढे बोलू तेवढे कमीच आहे. 
- पुष्पा यादव, पीपल्स एज्युकेशन स्कूल, मुख्याध्यापिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com