मुंबई - भारतातील पहिले तरंगते रेस्टॉरंट असा गाजावाजा करत मे 2014 मध्ये त्या वेळचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते वांद्रे परिसरात एका रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यात आले होते. आता याच ठिकाणी या रेस्टॉरंटचे शनिवारी (ता. 11) पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
भुजबळ यांनी उद्घाटन केल्याच्या बातम्या वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांवर झळकल्या होत्या. विविध देशांतील खाद्यपदार्थांचा एकाच छताखाली आस्वाद घेता येईल, 24 तास खुले कॉफी शॉप असेल आणि 660 जणांना बसता येईल, अशी घोषणा त्या वेळी करण्यात आली होती. थ्री टायर लक्झरी रेस्टॉरंटमध्ये दोन गॅलरी, डेक यांचा समावेश होता. मात्र, काही काळातच हे रेस्टॉरंट बंद झाले. आता पुन्हा त्याच ठिकाणी त्या कंपनीचे रेस्टॉरंट सुरू करत असल्याची घोषणा एमटीडीसीने केली आहे.
आधीच्याच रेस्टॉरंटचे पुन्हा उद्घाटन करायचे आणि त्याला नवा साज चढवायचा या एमटीडीसीच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या संदर्भात एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.
|