जॉब आहेत, कामगार नाहीत; FMCG कंपन्यांपुढील अडचण

जॉब आहेत, कामगार नाहीत ; FMCG कंपन्यापुढील अडचणी
जॉब आहेत, कामगार नाहीत ; FMCG कंपन्यापुढील अडचणी

मुंबई :  लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर देशातील उद्योगक्षेत्र पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. परंतु, कामगारांच्या संख्येवरील मर्यादेच्या अटीमुळे पूर्ण क्षमतेने उत्पादन घेणे शक्य नसल्याची तक्रार अनेक कंपन्या करत आहेत. किमान 75 टक्के कामगारांना कामावर येण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी एफएमसीजी (फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स) क्षेत्रातील पेप्सीको, पारले, हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड, आयटीसी, ब्रिटानिया, नेस्ले आदी कंपन्यांनी सीआयआयच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे केली आहे. 

कामगार संख्येची अट शिथिल करा 
केंद्र सरकारने ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये उद्योग सुरू करण्याची परवानगी दिली. त्यानुसार अनेक राज्यांत उद्योग सुरू झाले. सरकारने कंटेनमेंट झोन वगळून रेड झोनमध्येही उद्योग सुरू करण्याची परवानगी दिली. परंतु, केवळ 33 टक्के कामगारांना कामावर ठेवता येईल, अशी अट सरकारने घातली आहे. ही अट शिथिल करून ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये 75 टक्के कामगार, तर रेड झोनमध्ये 50 ते 60 टक्के कामगार ठेवण्याची परवानगी देण्याची मागणी या कंपन्यांनी केली आहे. सध्या पॅक्ड फूडला मोठी मागणी असल्याने उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे कामगार संख्येच्या मर्यादेतून सूट देणे आवश्यक असल्याचे या कंपन्यांचे म्हणणे आहे.

परवानगी मिळण्यात अडचणी
ग्रीन व ऑरेज झोनमध्ये उद्योग सुरू झाले, तरी कामगारांच्या उपलब्धतेचा मोठा प्रश्न आहे. कोरोनाच्या भीतीने अनेक कामगारांनी आपल्या गावाची वाट धरली आहे. कामगारांना कामावर येण्यासाठी पोलिस परवानगी मिळवणे जिकिरीचे आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश आदी राज्यांत पोलिस सहकार्य करत नसल्याची तक्रार या कंपन्यांनी केली आहे. मध्यंतरी सीआयआयच्या सर्वेक्षणातही ही बाब पुढे आली होती. 
 
ओव्हर टाईमचा मोबदला
कामगारांची कमतरता लक्षात घेता कामाची वेळ 8 तासांवरून 12 तास करण्यास अनेक राज्य सरकारांनी परवानगी दिली आहे. अतिरिक्त कामासाठी कामगारांना ओव्हर टाईमचा मोबदला किती द्यावा, याबाबत राज्यांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्र सरकारने ओव्हर टाईमचा मोबदला वेतनाच्या दुप्पट दराने देण्याचा आदेश दिला आहे. याबाबत देशात एकच नियमावली असावी, अशी मागणी उद्योजकांनी केंद्राकडे केली आहे.

केवळ 50 टक्के उत्पादन
लॉकडाऊनच्या काळात मालवाहतूक करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे मागणी असूनही या वस्तूंचा पुरवठा करणे शक्य नव्हते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही मालवाहतूक सुरळीत झालेली नाही. त्यामुळे आजही मागणीच्या तुलनेत पुरवठा केवळ 50 टक्के आहे. कामगारांच्या संख्येवरील मर्यादेमुळे या कंपन्याना केवळ 50 टक्के उत्पादन घेणे शक्य आहे. अनेक कंपन्या केवळ 60 ते 65 टक्के क्षमतेने सुरू आहेत.

मागणीत वाढ, पुरवठा नाही
लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात अत्यावश्यक वस्तूंचा साठा करण्याकडे नागरिकांचा कल होता. त्यामुळे काही वस्तूंच्या मागणीत अचानक वाढ झाली. मार्चमध्ये नेस्ले कंपनीच्या मॅगी आणि किटकॅट या उत्पादनांची मागणी 10.7 टक्क्यांनी वाढली. पुरवठ्यात अडचणी असल्यामुळे मॅगी नूडल्सचा तुटवडा कायम आहे. हिंदुस्तान लिव्हरच्या उत्पादनांची मागणी 7 टक्क्यांनी घटली आहे. त्यामागील कारणांचा आढावा घेत असल्याचे कंपनीच्या व्यवस्थापकांनी सांगितले.

एफएमसीजी मार्केट 
एकूण वार्षिक उलाढाल :
4. 2 लाख कोटी रुपये
पॅकेज्ड फूड्सचा वाटा : 58 टक्के
कामगार मर्यादा : केवळ 50 टक्के उत्पादन
मालवाहतुकीत अडचणी : पुरवठ्यावर परिणाम
2020 मधील अपेक्षित वाढ : 10 टक्के
अनेक कंपन्यांचा अंदाज : 5 ते 6 टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com