मुंबई - शस्त्र व औषध खरेदीसाठी पैसा उभारता यावा म्हणून नक्षलवादी गांजाची शेती करून विक्री करत असल्याचे महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) तपासात निष्पन्न झाले आहे. गांजाची ही शेती विदर्भ, छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या जंगलात होत असली, तरी त्याची माहिती काढून कारवाई करणे अत्यंत कठीण असल्याचा दावा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला.
उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेशात या गांजाची विक्री होते. याशिवाय ओरिसातील भागांमधूनही या गांजाचे वितरण होत आहे. "डीआरआय'च्या मुंबई विभागाने छत्तीसगडमधील रायपूर येथे कारवाई करत नारळांची वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला. या ट्रकमध्ये सहा हजार 545 किलो गांजा सापडला होता.
दहा कोटी रुपयांच्या गांजाच्या या तस्करीप्रकरणी ट्रकचालक सुरजित सिंग रंधावा, क्लीनर अवतार सिंग व मालक धर्मराव या तिघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर छत्तीसगडमधून पिता-पुत्रांना अटक केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व गांजा नक्षलवाद्यांचा आहे. या गांजाची उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश येथे विक्री केली जाणार होती.
100 कोटींची उलाढाल
देशभरात गांजाच्या वितरणातून नक्षलवादी दर वर्षी 50 ते 100 कोटींची उलाढाल करीत असल्याचा अंदाज आहे. छत्तीसगडमध्ये अटक केलेल्या आरोपींद्वारे वर्षातून पाच-सात वेळा गांजाचे वितरण झाले.
|