मुंबई - भायखळ्याच्या राणीबागेत भारतातील पहिल्या पेंग्विनचा जन्म झाल्यानंतर आता या प्राणिसंग्रहालयात जिराफ, झेब्रा आणि कांगारू असे प्राणी आणण्यातील अडथळा दूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राणीच्या बागेला लागून असलेला 27 हजार चौरस मीटरचा भूखंड पालिकेला देण्याचा निर्णय कायम ठेवल्याने हे प्राणी येथे आणणे शक्य होईल.
महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणाच्या पहिल्या टप्प्यात पेंग्विन आणण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वाघ, सिंह तसेच इतर देशी प्राणी येणार आहेत. या कामाला सुरवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात आफ्रिकन आणि ऑस्ट्रेलियन प्राणी आणण्याची योजना आहे. त्यासाठी मफतलाल मिलच्या 27 हजार 284 चौरस मीटर जागेचा विकास करण्यात येईल. या जागेचा वापर झेब्रा, जिराफ, कांगारू, तसेच आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया खंडातील इतर प्राणी ठेवण्यासाठी होईल, असे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.
चित्ता, जॅग्वारही?
भारतातून नामशेष झालेला चित्ताही मुंबईत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. शिवाय जॅग्वारही आणला जाण्याची शक्यता आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
|