मुंबई - महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर खऱ्या अर्थाने समाजाचा परिचय होतो, पण समाज अजूनही महिलांसाठी सकारात्मक झालेला नाही. समाजात वावरताना घाबरत जगण्यापेक्षा निर्भयतेने जगा. आज मुलींनी स्वसंरक्षित होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी केले. एसएनडीटी महिला विद्यापीठातील 66 व्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते.
महिला विद्यार्थिनींची शैक्षणिक प्रगती पाहून माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी भारावून गेले. तुम्ही सर्व माझ्या नातीच्या वयाच्या आहात. त्यामुळे जगात वावरताना स्वसंरक्षणासाठी तयार राहा, असा सल्ला त्यांनी दिला. समाजाच्या संकुचित मानसिकतेवरही त्यांनी टीका केली. कायद्याच्या भाषेत बलात्कारी पुरुष दोषी ठरतो आणि पीडित महिला निर्दोषी. मात्र, समाज पीडितेलाच दोषी ठरवतो. त्यामुळे मुलींनी स्वसंरक्षित होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महर्षी कर्वे यांच्यासोबतचे अनुभव सांगत स्त्री-शिक्षणासंबंधीच्या विद्यापीठाच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. एसएनडीटी महिला विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठ म्हणून मान्यता मिळण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती डॉ. सी. विद्यासागर राव यांनी समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवले. कुलगुरू शशिकला वंझारी यांनी विद्यापीठाचा दीक्षांत अहवाल सादर केला. या दीक्षांत समारंभात विद्यापीठातील 11 हजार 844 विद्यार्थिनींना पदवी व पदविका प्रदान करण्यात आल्या. या समारंभात 12 अभ्यासक्रमांतील एकूण 179 पदवी व पदविकांचा समावेश होता. या वर्षी प्रथमच मास्टर ऑफ व्हर्चुअल आर्ट विथ प्रोर्टेर्चर, बॅचलर ऑफ कॉमर्स विथ अकाउंटसी ऍन्ड फायनान्स, बॅचलर ऍन्ड मास्टर ऑफ स्पेशल एज्युकेशन इन मेंटल रिटार्देशन ऍन्ड
इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी आणि बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी विथ इलेक्ट्रॉनिक इंजिनियरिंग या पदव्या देण्यात आल्या. या समारंभात 47 विद्यार्थिनींना पीएचडी पदवी दिली गेली.
या समारंभात गुजरातमधील अहमदाबाद येथील डॉ. अरुणा वणीकर यांना त्यांच्या रेनल आणि ट्रान्सप्लान्ट पॅथॉलॉजी या क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल डी. लीट ही पदवी प्रदान करण्यात आली.
|