मुंबई - स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्राचे काम देशभरात उत्तम दर्जाचे होत असून, येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत राज्यातली सर्व शहरे हागणदारीमुक्त होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. अर्थसंकल्पी चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
राज्यात सध्या 135 शहरे हागणदारीमुक्त झाली असून, 31 मार्चपर्यंत आणखी 100 शहरे सहभागी होणार आहेत. गांधी जयंतीच्या 2 ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व शहरे हागणदारीमुक्त होणार असून, त्यासाठी 535 कोटींची तरतूददेखील करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. स्वच्छ व नियोजित शहरांचा विकास हे प्राधान्य असून शाश्वत सुविधांची निर्मिती करण्यात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे ते म्हणाले. केंद्राच्या मदतीने 44 शहरात पाणीपुरवठ्याची "अमृत' योजना राबविली जात असून, त्यासाठी 7776 कोटींचे आराखडेदेखील मंजूर झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पुढील वर्षभरात 50 शहरे स्वच्छ शहरं होणार असल्याचे ते म्हणाले. या शहरात पाणीपुरवठा, हागणदारीमुक्त, घनकचरा व्यवस्थापन याचे नियोजन असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. रेंगाळेले 8000 कोटींचे प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करणार असल्याचा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
|