मध्यरात्रीपूर्वीच हाफ रिटर्न!

मध्यरात्रीपूर्वीच हाफ रिटर्न!

मुंबई - मध्यरात्री १२ वाजल्यानंतर रिक्षा-टॅक्‍सीचालक नियमित भाड्यापेक्षा वाढीव भाडे आकारतात. मात्र, डिजिटल मीटर आल्यानंतरही त्यांच्याकडून प्रवाशांची होणारी लूटमार थांबलेली नाही. रात्री ११ नंतरच डिजिटल मीटरमध्ये नाईट चार्जप्रमाणे भाडे दाखवले जात असल्याने त्यांचे प्रवाशांशी खटके उडत आहेत.

अमित जगाते काही दिवसांपूर्वी रात्री १०.३० च्या सुमारास चर्चगेट ते सीएसटी असा प्रवास टॅक्‍सीने करत होते. त्या वेळी मीटरमध्ये नाईट चार्जनुसार भाडे पडत असल्याचे त्यांना आढळले. त्यांनी टॅक्‍सीचालकाला जाब विचारला असता मुंबईत एवढेच भाडे असल्याचे त्याने सांगितले. अमित यांनी वाढीव भाडे भरले. मध्यरात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत टॅक्‍सीचे किमान भाडे २८ रुपये आणि दिवसभर २२ असते. मात्र, त्या दिवशी रात्री १०.३० च्या सुमारास टॅक्‍सीच्या मीटरमध्ये भाडे २८ रुपयांपासून सुरू झाले, असेही त्यांनी नमूद केले.

प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रवक्ते अभय देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकारच्या तक्रारी येत असल्याचे सांगितले. प्रवाशांनी रिक्षा वा टॅक्‍सीचा क्रमांक दिल्यावर त्याची पडताळणी करून कारवाई करण्यात येते, असेही त्यांनी सांगितले. ऑनलाईन तक्रारीनुसारही अशा कारवाया करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

डिजिटल मीटरमध्येही गैरव्यवहार
रिक्षा-टॅक्‍सींमध्ये यापूर्वी असलेल्या मॅकेनिकल मीटरमध्ये गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. त्यामुळे काही वर्षांपूर्वी डिजिटल मीटर रिक्षा-टॅक्‍सींना सक्तीचे करण्यात आले. रिक्षाच्या पासिंगच्या वेळी मीटरची तपासणी करून आरटीओ कार्यालयाकडून ते सील केले जाते. मात्र, ते तोडून रिक्षा-टॅक्‍सी मीटरमधील घड्याळाची वेळ बदलून प्रवाशांची सर्रास लूटमार केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com