मुंबई - मालेगावमध्ये दहा वर्षांपूर्वी झालेल्या बॉंबस्फोटाच्या खटल्यातील आरोपी प्रसाद पुरोहित याला सोमवारी उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. अभियोग पक्षाने पुरावा म्हणून दाखल केलेल्या साक्षांकित प्रतींची मागणी करणारी त्याची याचिका न्यायालयाने नामंजूर केली.
विशेष एनआयए न्यायालयाने पुरोहितची मागणी यापूर्वी नामंजूर केली आहे. त्याविरोधात त्याने उच्च न्यायालयात अपील याचिका केली होती. त्याने केलेली मागणी अंतर्गत संवादात्मक आदेशासंबंधी असून, त्याची सुनावणी या याचिकेत होऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. अपील याचिकेचे रूपांतर रिट याचिकेत करण्याची मुभा न्यायालयाने पुरोहितला दिली आहे.
त्याच्याविरोधात बेकायदा कारवाया प्रतिबंधात्मक कायद्यानुसार (यूएपीए) खटला चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या खटल्यात दाखल केलेल्या कागदपत्रांच्या काही प्रतींची मागणी त्याने विशेष न्यायालयाकडे केली होती. खटल्याला विलंब लावण्याच्या हेतूने ही मागणी होत असल्याचे मत विशेष न्यायालयाने व्यक्त केले होते.
दरम्यान पुरोहित, प्रज्ञा सिंह आणि समीर कुलकर्णी या आरोपींनी बेकायदा कारवाया प्रतिबंधात्मक कायद्याखालील आरोप हटवण्यासाठी केलेल्या याचिकेवरील अंतिम सुनावणी चार मार्चला सुरू होणार आहे. मालेगाव येथे सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या बॉंबस्फोटात सहा जणांचा बळी गेला होता आणि 100हून अधिक जखमी झाले होते.
|