मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज स्थानकानजीकच्या हिमालय पूल दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या तीन परिचारिकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 25 लाखांची मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने केली आहे. मुंबईतील 26/11 (2008) च्या दहशतवादी हल्ल्यात कामा व अल्बलेस रुग्णालयांत मृत्युमुखी पडलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे या परिचारिकांच्या कुटुंबांना मदत दिली जावी, अशी मागणी फेडरेशनने केली आहे.
जीटी रुग्णालयातील अपूर्वा प्रभू, भक्ती शिंदे व रंजना तांबे या परिचारिकांचा कामावर जात असताना हिमालय पूल दुर्घटनेत मृत्यू झाला. नुकसानभरपाई म्हणून सरकारने या तिन्ही परिचारिकांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही रक्कम परिचारिकांच्या सात ते आठ महिन्यांच्या पगाराएवढी असल्याचा मुद्दा महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या सरचिटणीस कमल वायकोळे यांनी मांडला. अपूर्वा प्रभू व भक्ती शिंदे यांच्या मागे पती व मुले असा परिवार आहे; या मुलांचे शिक्षण बाकी आहे, असे त्यांनी सांगितले.
मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कामा आणि अल्बलेस रुग्णालयांतील सरकारी कर्मचाऱ्यांना 25 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली होती. त्याचप्रमाणे नवीन घर आणि कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीही देण्यात आली होती.
|