रायगडमधील शेतकरी सुपारीच्या प्रेमात

रायगड जिल्ह्यात सुपारी पीक बहरले आहे.
रायगड जिल्ह्यात सुपारी पीक बहरले आहे.

अलिबाग ः भातशेतीतील अनिश्‍चितता, आंबा उत्पादनातील स्पर्धेमुळे दरातील होणारी घसरण आदी कारणांमुळे रायगड जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आले आहेत; पण त्यांना सुपारीच्या रूपाने आशेचा किरण दिसत आहे. त्यामुळे या पिकाकडे अनेक जण आकर्षित झाले असून गेल्या तीव वर्षांत त्याचे क्षेत्रफळ 400 हेक्‍टरने वाढले आहे. 

भारतात केरळ आणि कोकणात सुपारीचे उत्पादन घेतले जाते. ते मागणीपेक्षा कमी असल्याने दर वाढत आहेत. पाच वर्षांपासून त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे, अशी माहिती बागायतदारांनी दिली. या पिकाच्या बागांवरही वेगवेगळे रोग पडत असल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. मात्र, वेळेवर औषध फवारणी केल्यावर रोगांचा प्रादुर्भाव कमी होत असतो. यावर संशोधन होत असल्याने सुपारी बागायतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांचे उत्पन्नही वाढत आहे. त्याचेच फलित म्हणून अनेक जण या पिकाकडे आकर्षित होत असून त्याचे क्षेत्रफळ वाढत आहे. 2017 मध्ये या पिकाचे 2100 हेक्‍टर क्षेत्र होते. ते यंदा 400 हेक्‍टरने वाढले आहे. विशेष म्हणजे रोठा सुपारी लागवडीकडे बागायतदारांचे अधिक कल आहे. 
 
सुपारीला योग्य वातावरण 
सुपारी, नारळ आणि मसाल्याच्या पिकांना पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होणारी जमीन आवश्‍यक आहे. ती रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर आहे. त्याचबरोबर हवामानही या भागात अनुकूल आहे. श्रीवर्धन सुपारी संशोधन केंद्र उत्कृष्ट दर्जाची रोपे तयार करत असल्याने हे पीक लोकप्रिय ठरले आहे. 

सुपारीच्या माडाला भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्‍यकता असल्याने बागेतील अनावश्‍यक झाडे कमी करावी लागतात. पाण्याची मात्रा आणि वेळोवेळी औषधांची फवारणी केल्यावर कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळते. त्यामुळे शेतकरी या पिकाकडे आकर्षित होत आहेत. 
- इस्माईल वावेकर, सुपारी बागायतदार 

सुपारी लागवडीला फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत अनुदान दिले जाते. या अनुदानाचा येथील शेतकऱ्यांनी चांगला फायदा घेतला असल्याने सुपारीचे क्षेत्र वाढत आहे. या पिकाद्वारे बागायतदारांना चांगले उत्पादन मिळत आहे. 
- पांडुरंग शेळके, जिल्हा कृषी अधीक्षक, 

श्रीवर्धनची रोठा सुपारी प्रसिद्ध आहे. या सुपारीत पांढरा भाग जास्त असतो. त्याचबरोबर साखरेचे प्रमाण 2 ते 3 टक्के असते. या सुपारीची चव गोड असते. यामध्ये आरेक्‍लोनीन या रसायनाचे प्रमाण खूपच कमी असते. हे येथील वातावरणामुळे सुपारीमध्ये उतरलेले गुणधर्म आहेत. 
- सलिम महालदार, संशोधक, सुपारी संशोधन केंद्र, श्रीवर्धन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com