डोंबिवली : निळजे येथील लोढा हेवन मध्ये शांती उपवन या इमारतीला तडे गेल्याने तसेच त्याला लागून असलेल्या पाच इमारतींमधील कुटूंबियांना सुरक्षेच्या दृष्टीने स्थलांतरीत करण्यात आले आहे. 240 कुटुंब विस्थापित झाली असून या रहिवाशांना घराची चिंता सतावत आहे.
या ठिकाणी धोकादायक इमारत पाडून तेथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतीत नागरिकांना हक्काचे घर पुन्हा देण्यात यावे अशी सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विकासकांना दिली आहे. तसेच इमारतीचे काम पूर्ण होई पर्यंत बाधित कुटूंबांना घरभाडे देखील विकासकाकडून दिले जाईल असे आश्वासन खासदारांनी रहिवाशांना बुधवारी दिले.
शिळफाटा येथील लोढा हेवन गृहप्रकल्पातील शांती उपवन इमारत धोकादायक झाल्याने येथील 240 कुटूंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. येथील रहिवाशांनी त्यांच्या निवासाचा आणि हक्काच्या घराचा प्रश्न लवकर मार्गी लागावा यासाठी तगादा लावला आहे.
कल्याण शीळ रस्ता रोको आंदोलन करत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तसेच खासदार डॉ. शिंदे यांची भेट घेत त्यांनाही यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली होती. बुधवारी खासदार शिंदे यांनी केडीएमसी मुख्यालयात आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, लोढा विकासक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत शांती उपवन मधील नागरिकांची बैठक घेतली.
या बैठकीस शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, माजी सभापती दीपेश म्हात्रे, तालुका प्रमुख महेश पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होत. खासदार शिंदे म्हणाले, नागरीकांना बिल्डरकडून घरे बांधून दिली जातील. त्यासाठी काही कालावधी लागू शकतो.
त्या दरम्यान या नागरीकांच्या घराचे भाडेही दिले जाईल. येथील गाळे धारकांना इमारतीच्या परिसरात तात्पुरत्या स्वरुपात दुकान अथवा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येईल.
हे सरकार शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे....
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. शिंदे-फडणवीस सरकारने यापूर्वीही एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून 12 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. हे सरकार शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. राज्याच्या अर्थ संकल्पातही शेतकऱ्यांचा नक्कीच चांगला विचार केला जाईल असा विश्वासही खासदार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
शेवटच्या टोकापर्यंत मेट्रो नेण्याचा संकल्प....
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेचे काम सुरु आहे. त्याचबरोबर कल्याण ते तळोजा हा मेट्रो मार्ग तयार केला जाणार आहे. त्याचे टेंडरही काढण्यात आले. मात्र उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर याठिकाणीही शेवटच्या टोकापर्यंत मेट्रो नेण्याचा संकल्प आहे. बदलापूर पर्यंत मेट्रो नेण्याची प्रोव्हीजन आम्ही केली आहे. तशा सूचनाही एमएमआरडीएला दिल्या असल्याचे यावेळी खासदार शिंदे यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.