मुंबई : कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भाज्यांच्या आवक मोठ्या प्रमाणात घटली असल्याने भाज्यांच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक भाज्या 100 रुपये किलोपेक्षा अधिक दराने मिळत आहेत. वाढलेल्या दरामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. भाज्यांसह कांद्याच्या दरातही वाढ होत असल्याने तो साठवून ठेवण्याकडे व्यापाऱ्यांचा कल आहे. परिणामी पुढील काही महिन्यांत दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईतील वाशी बाजारात घाऊक भावात भाज्यांची खरेदी केली जाते; तरीही किरकोळ विक्रेते आजही भायखळा येथे जाऊन भाजीपाला व कांदे-बटाटे खरेदी करण्यासाठी येतात. सध्या या ठिकाणी टोमॅटो प्रतिकिलो 70 ते 80 रुपये असा मिळत असून लसून 150 रुपयांवरून अडीचशे रुपये प्रतिकिलोपर्यंत मिळत आहे. हिरव्या मिरचीचा दर 450 ते 500 रुपये प्रतिकिलो झाला आहे; तर दुधी भोपळा 100 ते 120 रुपये किलोने विकण्यात येत आहे. 30 रुपये किलोने विकली जाणाऱ्या सिमला मिरचीचा दर शंभरीपार गेला असून भेंडी 120 ते 140 रुपये प्रतिकिलोने मिळत आहे.
कांदा रडवणार
महापूर व अतिवृष्टीमुळे कांद्याचे पीक नष्ट झाले असून 15 रुपये किलोने मिळणारा कांदा आता 18 ते 22 रुपये प्रतिकिलोने मिळत आहे. पुणे, नाशिक, धुळे, अहमदनगर, लासलगाव, चाळीसगाव, मालेगाव या ठिकाणावरून येणाऱ्या कांद्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे आवक मंदावली आहे. नोव्हेंबरमध्ये नवीन कांदा बाजारात दाखल होईल. त्यामुळे सध्या कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात व अन्य ठिकाणांहून कांद्याची आवक होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून टंचाई दाखवीत दरवाढ होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई बाजार समितीतील काही ठोक विक्रेत्यांनी कांदा, बटाटा, लसून याचे दर गगनाला भिडण्याची शक्यता असल्याचे माहिती देताना सांगितले.
यापूर्वीचा दर सध्याचा दर (रु. प्रतिकिलो)
टोमॅटो 50 80
लसूण 150 250
हिरवी मिरची 300 500
दुधी भोपळा 60 120
सिमला मिरची 30 110
भेंडी 60 140
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.