पोलिस वसाहती किती सुरक्षित?

पोलिस वसाहती किती सुरक्षित?

मुंबई - उन्हा-पावसाची तमा न बाळगता मुंबईकरांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांचेच कुटुंब असुरक्षिततेच्या छायेत पोलिस वसाहतींमध्ये राहत आहे. आपल्या बायका-मुलांना घरी ठेवून कर्तव्यासाठी ऑनड्युटी २४ तास रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या पोलिसदादांना आपले कुटुंबीय घरी सुरक्षित तर आहेत ना, याची भीती सतावत आहे.

वरळीच्या बीडीडी चाळीतील पोलिस वसाहतीत मंगळवारी छताचा काही भाग कोसळून एक महिला जखमी झाली. त्यावरून वरळी पोलिस वसाहतीतील घरांच्या पाहणीत काही घरांची अवस्था फारच बिकट असल्याचे आढळले आहे. पावसाळ्यात गळणारी घरे आणि धोकादायक छतामुळे पोलिस कुटुंब जीव मुठीत धरून राहतात, असेही दिसून आले.

पोलिस वसाहतींमधील घरांची दुरुस्ती करण्यात प्रशासन टाळाटाळ करत असल्याने अशी परिस्थिती आली आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षे हीच अवस्था कायम असून, ती बदलण्याचा प्रयत्न कोणीही करीत नाही, असाही आरोप कुटुंबीयांकडून होतो.

वरळीच्या घटनेत पोलिस पत्नी जखमी झाल्यानंतर पोलिसांच्या घरांच्या दुरवस्थेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आजूबाजूला उच्चभ्रू वस्ती असलेली वरळी वसाहतही याला अपवाद नाही. वरळी पोलिस कॅम्प परिसरातील इमारतींचीही अशीच दुरवस्था झाली आहे. विशेष करून येथील ‘जे’ व ‘एच’ इमारतींची अवस्था खूपच गंभीर आहे.

अनेक इमारती सुमारे ५० वर्षे जुन्या आहेत. पूर्वीपेक्षा या वसाहतीतील घरांच्या स्थितीत बराच सुधार झाला असता तरीही अनेक घरांमध्ये पोलिस कुटुंबीय आजही जीव मुठीत घेऊन तेथे राहतात, असे दिसले.

जुन्या इमारतींची वरवरची डागडुजी करून त्यात नव्याने दाखल होणाऱ्या पोलिसांना जागा दिली. जुन्या इमारतींच्या भिंतींना तडे गेले. त्यामुळे दर वेळी प्लास्टर निघणे, स्लॅब कोसळणे अशा घटना वारंवार घडतात. विशेष करून कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या घरांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. डागडुजी करण्यापेक्षा संरचनात्मक दुरुस्त्या कराव्यात, अशीही मागणी पोलिस कुटुंबीय करीत आहेत.एका घराच्या पाहणीत बाथरूमच्या वरच्या बाजूला मोठ्या भेगा पडल्या असून, त्यामुळे हा भाग कधीही पडेल अशी भीती कुटुंबीयांना आहे. रहिवाशांनी याबाबत अनेकदा तक्रार केली आहे. दुरुस्तीसाठी अर्जही करण्यात आला होता; मात्रत्याची दखल घेतली नसल्याची खंत त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

प्रशासनाकडून मुस्कटदाबी
मंगळवारच्या घटनेची माहिती प्रसारमाध्यमांना कशी मिळाली, याची चौकशी वरिष्ठांकडून सुरू होती. त्याबाबत चार पोलिसांवर प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड आकारण्याची तयारीही सुरू असल्याची चर्चा होती. त्यामुळे वरळी बीडीडी चाळीतील व इतर वसाहतींमधील पोलिसांचे नातलगही आज त्याबाबत उघडपणे बोलण्यास तयार नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com