मुंबई - रस्त्यावर विकला जाणारा बर्फ मानवी विष्ठेएवढा दूषित असल्याचे आढळल्यानंतर राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने राज्यातील शाळांच्या उपाहारगृहांमध्ये बर्फाचे गोळे आणि सरबत विक्रीवर बंदी घातली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेने सोमवारी (ता. 8) 13 हजार 700 किलो बर्फ नष्ट केले.
मुंबईत रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या 75 टक्के बर्फांत मानवी विष्ठेत आढळणारा ई-कोलाय हा घातक विषाणू आढळल्यामुळे पालिकेने फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली आहे. देवनार, गोवंडी परिसरातील 13 हजार किलो बर्फ सोमवारी (ता. 8) नष्ट करण्यात आले.
राज्यात काही मोजक्याच कारखान्यांना खाण्याचा बर्फ बनवण्याची परवानगी अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे; मात्र औद्योगिक वापरासाठी बनवला जाणारा बर्फ सर्रासपणे रस्त्यावर, उपाहारगृहे आणि ज्यूस सेंटरमध्ये खाण्यासाठी विकला जातो. शाळकरी विद्यार्थ्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे दूषित बर्फामुळे त्यांना गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्य सरकारने शाळांच्या कॅन्टीनमध्ये बर्फाचे गोळे विकण्यावर बंदी घातली आहे. सरबत बनवण्यासाठीही दूषित पाण्याचा वापर होण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने त्यावरही बंदी घातली आहे.
|