मुंबई - कौन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (आयसीएसई) मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने घेतला आहे.
या निर्णयामुळे आयसीएसई मंडळाला दणका बसला असून, अकरावी प्रवेशप्रक्रियेत राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. "आयसीएसई'ने विद्यार्थ्यांच्या गुणपद्धतीत गट एक, दोन आणि गट तीन अशी विषयांची वर्गवारी केली होती. मात्र, त्या मंडळाने यंदा गटामध्ये बदल केला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अंतर्गत परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळाले. त्याचप्रमाणे गटामधील विषय बदलण्यात आल्याने त्या मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या सरासरी गुणांमध्ये वाढ झाली.
राज्य मंडळातून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसणार होता. आधीच निकाल घसरल्याने राज्य मंडळातील विद्यार्थ्यांचा प्रवेश अडचणींचा बनला असतानाच आयसीएसई मंडळाची ही चलाखी शिक्षण विभागाच्या लक्षात आली. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने "आयसीएसई'च्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील एकूण सहा विषयांचे सरासरी गुण विचारात न घेता पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीएसई मंडळातून राज्यात सुमारे 20 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
|