महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र अनिवार्य

महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र अनिवार्य
महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र अनिवार्य

नवी मुंबई : महापालिकेत येणारे नागरिक आणि अधिकारी व कर्मचारी यांची ओळख लक्षात यावी, याकरिता महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना ओळखपत्र बाळगणे अनिवार्य केले आहे. महापालिका मुख्यालयासहीत महापालिकेचे रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र, विभाग कार्यालये आदी कार्यालयांमधील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बाळगण्याचे बंधनकारक केले आहे. यासहीत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ओळखपत्राची अट घालण्यात आली आहे. 

नवी मुंबई महापालिकेचे बेलापूर येथे पामबीच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मुख्यालयात दिवसभर शेकडो नागरिकांची विविध कामांसाठी ये-जा सुरू असते. मुख्यालयात येणाऱ्यांमध्ये लोकप्रतिनिधींसहीत विविध पक्षांचे पदाधिकारी, युनियनचे पदाधिकारी, कंत्राटदार, विकासक, दलालांचा समावेश असतो; परंतु कर्मचारी व अधिकारी यांना गणवेश नसल्यामुळे नेमका कोणता अधिकारी व कोण पदाधिकारी यांची ओळख लक्षात येत नसल्याने सामान्य नागरिकांची मोठी पंचाईत होत असते. तसेच महापालिकेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही मोठा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. याआधीही महापालिकेचे तत्कालीन महापौर सुधाकर सोनवणे असताना एका निनावी पत्रातून मुख्यालयात स्फोट घडवून आणण्याची धमकी महापालिकेला मिळालेली असल्याने तो धोकाही मुख्यालयाला आहे. तसेच या इमारतीचे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने देशातील वास्तुकलेचा नमुना म्हणूनही संरक्षण करणे अनिवार्य असल्याने ओळखपत्र बाळगल्यास फायदा होणार आहे. 

अण्णासाहेब मिसाळ यांनी ओळखपत्राची सूचना लागू केल्यामुळे आज दिवसभरात संबंधितांकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बाळगण्यास सूचना देण्यात येत होत्या. मुख्यालयात, रुग्णालयात, नागरी आरोग्य केंद्र व विभाग कार्यालयात सकाळी कामावर येण्याआधी प्रवेशद्वारावर ओळखपत्र तपासले जाणार आहे. त्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने ओळखपत्र स्वतःजवळ बाळगण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

स्कॅनिंग मशीन येणार
महापालिका मुख्यालयात ये-जा करणाऱ्या शेकडो नागरिकांसोबत बॅग आणि पिशव्या तपासण्यासाठी एक स्कॅनिंग मशीन बसवण्यात येणार आहे. सध्या मेटल डिटेक्‍टरद्वारे ही तपासणी केली जात आहे; मात्र लवकरच बॅग व पिशव्या तपासण्यासाठी स्कॅनिंग मशीन बसवण्यात येणार आहे. 

महापालिकेत येणाऱ्या नागरिकांना अधिकारी कोण व कर्मचारी कोण, यांची ओळख लक्षात येण्यास मदत व्हावी. जेणे करून नागरिकांची अनोळखी व्यक्तींकडून फसवणूक होणार नाही. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही शिस्त लागेल, हा ओळखपत्र बंधनकारक करण्यामागील हेतू आहे.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com