मुंबई - आयआयटीमधून विविध अभ्यासक्रमांत पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील संशोधनासाठी मिळणाऱ्या पाठ्यवृत्तीत (फेलोशिप) वाढ झालेली नाही. त्यामुळे पाठ्यवृत्ती वाढवण्याच्या मागणीसाठी 21 डिसेंबरला आंदोलन करण्याचा इशारा आयआयटीमधील विद्यार्थ्यांनी दिला आहे.
आयआयटीमधील शिक्षण खर्चिक असते; उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संशोधन करावे लागते. या संशोधनासाठी भारतीय विद्यार्थ्यांना काही संस्था आणि सरकारकडून मिळणारी पाठ्यवृत्ती अत्यल्प असल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले. पोस्टग्रॅज्युएट स्टुडंट्स कौन्सिल (पीजीएससी) या संघटनेने पाठ्यवृत्तीत वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आहे. पाठ्यवृत्तीच्या रकमेत सरकारने चार वर्षांत वाढ केलेली नाही.
शिक्षणाचा खर्च वाढल्यामुळे अडचणी येत आहेत, असे गाऱ्हाणे विद्यार्थ्यांनी मांडले. पाठ्यवृत्तीची रक्कम वाढवण्यासाठी आयआयटीमध्ये स्वाक्षरी अभियान घेण्यात आले होते. हे पत्र केंद्र सरकारला सादर करण्यात आले आहे. टाटा समाज विज्ञान संस्थेमधील (टीआयएसएस) विद्यार्थ्यांनीही अशाच तक्रारी केल्या आहेत.
|