भारतीय रेल्वेचा पुरातन ठेवा जमिनीखाली गुडूप 

thane
thane

ठाणे : भारतीय रेल्वेला 166 वर्ष पूर्ण झाली. त्या रेल्वेच्या आठवणी जागवणाऱ्या पुरातन पाउलखुणा विकासाच्या नावाखाली चक्क जमिनीखाली गुडुप झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

ठाणे पूर्व, कोपरी परिसरातील मिठबंदर रोडवरील ठामपा ओपन आर्ट गॅलरीशेजारील रस्त्याच्या सिमेंट क्रॉंक्रीटीकरणाच्या खोदकामा दरम्यान रेल्वेचा ब्रिटिशकालीन लोहमार्ग आढळला.लोहमार्गाचे हे केवळ हिमनगाचे टोक असून तब्बल दीड किमी.चा लोहमार्ग ठाणे पूर्व स्टेशन ते खाडी विसर्जन घाट या रस्त्याखाली गाडला गेल्याचे वास्तव स्थानिकांनी समोर आणले आहे. तेव्हा, अशा प्रकारे रेल्वेच्या जागेत होत असलेल्या नागरी कामांच्या अतिक्रमणाची रेल्वे प्रशासनाने दखल का घेतली नाही.असा सवाल इतिहास अभ्यासक करीत आहेत.    

भारतातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 मध्ये वाडीबंदर ते ठाणे अशी धावली. याच दरम्यानच्या काळात पुढे रेल्वेचे विस्तारीकरण झाले. त्यानंतर ठाणे पूर्वेकडील भागात रेल्वेच्या भव्य यार्डात रेल्वेच्या वाघिणीतील दगडी कोळसा, चुनखडी, मार्बल, लाद्या आदी माल उतरत असे. याशिवाय, पूर्वेकडील खाडीकिनारी (आताचा विसर्जन घाट) कस्टम जेटी आणि बंदर होते.तसेच,या परिसरात विस्तिर्ण खाडीत पसरलेली मिठागरे असल्याने मालगाडीच्या डब्यातून मीठ व इतर वस्तुंची ने-आण व्हायची. मात्र,काळाच्या ओघात मिठागरे गेली, मालवाहतूकही बंद पडली. विकासाच्या नावाखाली रेल्वेच्या ऐतिहासिक पाउलखुणा जमिनीखाली गाडून भव्य रस्ते उभारण्यात आले. या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम ठाणे महापलिकेच्या मार्फत ठेकेदार करीत आहे.रस्त्याचे खोदकाम करीत असताना येथील आर्ट गॅलरी नजीकच्या रस्त्याखाली लांबचलांब लोहमार्ग आढळला.त्यामुळे,भारतीय रेल्वेच्या जुन्या पाऊलखुणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.कोपरीत आढळलेला हा लोहमार्ग पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होत असून आजच्या पिढीतील नागरिकही या अनमोल पाउलखुणा कायमच्या मिटल्या जाण्याची भिती व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, खोदकामात सापडलेल्या या लोहमार्गाची तपासणी ठाणे महापलिकेच्या अभियंत्यांनी केली.तसेच,तूर्तास ठेकेदारास काम थांबवण्यास सांगितले असून याबाबत पालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवले आहे.त्यांच्या निर्णयानंतरच पुढील कामाबाबत निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

रस्त्याच्या खोदकामात आढळलेल्या लोहमार्गाबाबत ठाणे महापालिकेने मध्य रेल्वेच्या ठाणे विभागीय अभियांत्रिकी शाखेला पत्र दिले आहे.त्यानुसार,पाहणी करून त्याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल.
- अनिलकुमार जैन, मध्य रेल्वे,जनसंपर्क अधिकारी

ठाणे पूर्वेकडील मीठ बंदर, गणेश विसर्जन घाट सध्या कोपरीकरांची चौपाटी म्हणून ओळखली जाते. येथे पूर्वी बंदर असल्याने जहाजातून आलेला माल रेल्वेच्या वाघिणीतून ने-आण केली जात असे. हा परिसर पूर्वी निर्जन होता. येथून थेट ठाणे स्थानकापर्यंत लोहमार्ग जमिनीखाली गाडला गेलेला आहे. सध्याच्या फलाट क्रमांक 10 बाहेरील पार्किंग लॉटमधील जागेत पूर्वी माल उतरत असे. याठिकाणी रेल्वेचे तीन मार्ग होते.त्यावर येणारी मालगाडी अनेक दिवस उभी राहत असल्याचे चित्र नेहमीच दिसे. याच भागात रेल्वे पॉवर हाऊसची भव्य इमारतदेखील होती. येथूनच रेल्वेच्या विद्युत पुरवठ्याची व्यवस्था पाहिली जात असे. सध्या मीठ बंदरवरील विसर्जन घाटावर जमिनीमध्ये उलट्या गाडून ठेवलेल्या तोफा ऐतिहासिक साक्ष देतात. बंदरावर एकूण 19 तोफा होत्या मात्र त्यापैकी 5 तोफा खाडीतील चिखलात रुतल्या असून पैकी 14 तोफा दिसतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com