नववर्षात झोपडपट्टीवासीयांना वैयक्तिक नळजोडणी

नववर्षात झोपडपट्टीवासीयांना वैयक्तिक नळजोडणी
नववर्षात झोपडपट्टीवासीयांना वैयक्तिक नळजोडणी

नवी मुंबई - शहरातील 2000 च्या आधीच्या झोपडपट्टीधारकांना अवघ्या दोन कागदपत्रांच्या आधारावर वैयक्तिक नळजोडणी देण्याचा धाडसी निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे.

अनेक वर्षांपासून सार्वजनिक पाणवठ्यावर पाण्यासाठी रांगा लावणाऱ्या, नंबरवरून हाणामाऱ्या करणाऱ्या येथील झोपडपट्टीवासीयांची पाण्यासाठीची डोकेदुखी यामुळे संपणार आहे. मुंढेंच्या या निर्णयाचा 42 हजार झोपडीधारकांना याचा लाभ मिळणार आहे, तर शहरातील भोगवटा प्रमाणपत्र नसणाऱ्या इमारतीतील रहिवाशांनाही पाणीपुरवठा देण्याचा निर्णय मुंढे यांनी घेतला आहे.
प्रशासकीय कामांना प्रगत यंत्रणेची जोड देत 21 प्रकारचे दाखले ऑनलाईन देणारी राज्यातील पहिली महापालिका ठरल्यानंतर शहरातील 2000 पूर्वीच्या झोपडपट्टीवासीयांना वैयक्तिक नळजोडणी घेण्यासाठी तुकाराम मुंढेंनी हिरवा कंदील दाखवला आहे. शहरातील मोकळ्या जागांवर परिस्थितीअभावी वसल्या जाणाऱ्या झोपडपट्ट्यांना महापालिकेकडून मानवतेच्या आधारावर पाणीपुरवठा केला जात होता. लाखोंच्या घरात असलेल्या झोपड्यांना दिलेल्या सार्वजनिक पाणवठ्यावर रांगेत उभे राहून पाणी भरावे लागत होते. यातून अनेकदा भांडणेही होत होती; परंतु आता ही डोकेदुखी संपणार आहे. त्यांना दीड हजार रुपये भरून थेट महापालिकेकडून त्यांच्या राहत्या झोपडीत स्वतंत्र नळजोडणी घेता येणार आहे. विकसकांच्या चुकांमुळे कचाट्यात अडकलेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्राअभावी पालिकेकडून पाणीपुरवठा दिला जात नसल्याने येथील नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. अशा भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींनाही आयुक्तांनी नळजोडण्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना भोटवटा प्रमाणपत्र मिळेपर्यंत वाणिज्य दराने पाणी देयके आकारली जाणार आहेत. आयुक्तांच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शहरातील 134 भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना नळजोडण्या मिळण्याची शक्‍यता आहे.

सार्वजनिक पाणवठ्यावर मुबलक पाणी मिळत नसल्याने अनेकदा झोपडपट्टीमधून जाणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांना मध्येच तोडून बेकायदेशीर पाणी घेतले जाते. यात पाण्याची चोरी होतेच, शिवाय मोठ्या प्रामाणात पाणीगळतीही होते. महापालिकेच्या या निर्णयामुळे जास्तीत जास्त झोपड्यांमध्ये पाणी पोहोचल्यास यावर अंकुश येईल.
- तुकाराम मुंढे, आयुक्त

कागदपत्रांचा खटाटोप कमी
नळजोडणी घेण्यासाठी साधारणपणे 15 विविध प्रकारची कागदपत्रे अर्जदाराला महापालिकेकडे सादर करावी लागत होती; परंतु यातही महापालिकेने शिथिलता आणल्याने फक्त सर्वेक्षण पावती आणि आधार कार्डच्या आधारावर अर्जदाराला अर्ज करता येणार आहे. तुकाराम मुंढे यांच्या वैयक्तिक नळजोडणीच्या घोषणेनंतर लागेचच 500 झोपडीधारकांनी महापालिकेकडे त्यासाठी अर्ज केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com