मुंबई - सत्य- अहिंसेच्या विचारांची ताकद आयुष्यच बदलून टाकते, याची प्रचिती येरवडा कारागृहातून नुकत्याच सुटलेल्या 53 वर्षीय कैद्याला आली. बराकीत दुःख विसरण्यासाठी गायलेल्या गाण्याने त्यांना तुरुंगात रेडियो जॉकी बनवले. यातून सुरू झालेल्या सुरेल वाटचालीत शांतता- अहिंसेचा मार्ग सापडल्यावर पुढील आयुष्य शांतिदूत म्हणून जगण्याचे त्यांनी ठरवले आहे.
पुण्यात राहणारे नितीन पुरुषोत्तम आरोळे यांची ही सत्यकथा. पाच वर्षांपूर्वी गैरसमजातून झालेल्या आरोपांतून त्यांना अटक झाली. दोन वर्षांनी त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली. येरवड्याच्या खुल्या कारागृहात ते शिक्षा भोगत होते, तेव्हा त्यांच्या मनात सुडाची भावना पेटली होती. बराकीत दिवस कंठताना इतर कैद्यांची व्यथा त्यांनी जाणून घेतली. त्यांची मने जुळली. गांधी विचारांची पुस्तके ते फावल्या वेळेत वाचू लागले. संगीतासोबत पुस्तकांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. गजाआडच्या या दिवसांत कधी त्यांची चेष्टाही झाली; पण ते हिम्मत हरले नाहीत.
कित्येकदा त्यांना झोपही लागायची नाही. झोप लागावी म्हणून आणि मनाची समजूत घालण्याकरिता ते रात्रीच्या वेळेस कोठडीतच गाणी म्हणायचे. त्यांच्या गाण्याला इतर कैदी तितकीच दाद द्यायचे. एके रात्री त्यांनी "दोस्ती' चित्रपटातील "चाहूंगा मैं तुझे सांज सवेरे' हे गाणे गायले. ते ऐकून काही कैद्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. त्यानंतर कैद्यांच्या मनोरंजनासाठी ते रेडियो जॉकीही बनले. याचसोबत ते गांधीविचारांचा प्रसार करू लागले. त्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक (तुरुंग प्रशासन) विठ्ठल जाधव यांनी आरोळे यांचे खास कौतुकही केले. शांतिदूत परिवार व प्रेरणापंत या संस्थांच्या संपर्कात आल्यावर त्यांनी संगीताचा वसा घेतला. चार- पाच कैद्यांना गाणे शिकवले. ते कैदी आता कारागृहात रेडियो जॉकीच्या माध्यमातून गांधीविचारासह जनप्रबोधनाचे काम करत आहेत. मागील 15 ऑगस्टला आरोळे यांची चांगल्या वर्तणुकीमुळे कारागृहातून सुटका झाली.
ऑर्केस्ट्रातून संदेश
तुरुंगातून सुटलेल्या कैद्यांचा "जेल ऑर्केस्ट्रा' सुरू करण्याचा नितीन आरोळे यांचा मानस आहे. याशिवाय सुटका झालेल्या बंद्यांचा व्हॉट्सऍप ग्रुप तयार करून गांधीविचारांचा ते प्रसार करणार आहेत.
|