कल्याणचा पत्रिपूल मार्चपर्यंत नागरिकांच्या सेवेत 

हैदराबाद : पाहणी करताना खासदार श्रीकांत शिंदे आणि अन्य मान्यवर 
हैदराबाद : पाहणी करताना खासदार श्रीकांत शिंदे आणि अन्य मान्यवर 

कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या पत्री पुलाचे काम फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होऊन मार्च महिन्यात तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या पुलाच्या ओपन वेब गर्डरचे काम सध्या हैदराबाद येथे वेगाने प्रगतिपथावर असून 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. याचसोबत तिसऱ्या पुलासाठी आवश्‍यक असलेल्या गर्डरच्या कामालाही सुरुवात करण्यात आल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून कोंडीत अडकलेल्या नागरिकांची सुटका होण्याची आशा पल्लवीत झाली आहे.
 
पत्रि पुलाला समांतर असा आणखी एक तिसरा पूलही राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मंजूर केला असून त्याच्याही कामाला सुरुवात झाली आहे. पायलिंग आणि खांब उभारण्याचे काम प्रत्यक्ष जागेवर वेगाने सुरू असून पुलाचा अत्यंत महत्त्वाचा, केंद्रीय भाग असलेल्या गर्डरचे काम हैदराबाद येथी ग्लोबल स्टील कंपनी येथे सुरू आहे.

या कामाची पाहाणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी (ता. 16) हैदराबाद येथे जाऊन केली. त्यांच्यासमवेत एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता एस. व्ही. सोनटक्के, कार्यकारी अभियंता नितीन बोरोले, पत्री पुलाचे काम करणाऱ्या ब्रिज इंजिनिअरिंग या कंत्राटदार कंपनीचे दीपक मंगल, ग्लोबल स्टीलचे ऋषी अगरवाल, साकेत शर्मा आदी उपस्थित होते.

कामाची पाहाणी करून गर्डरच्या कामाच्या प्रगतीबद्दल डॉ. शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. पुलाच्या प्रत्यक्ष जागी कल्याण दिशेला आठपैकी सहा खांब उभे राहिले असून डोंबिवली दिशेला सहापैकी चार खांबांचे काम पूर्ण झाले आहे. 

फेब्रुवारी अखेरपर्यंत ही कामे आणि अप्रोच रस्त्याचे काम पूर्ण होईल आणि मग ओपन वेब गर्डर टाकून मार्च महिन्यात हा पूल प्रवासी वाहतुकीसाठी खुला होईल, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रत्येकी पाच तासांचे दोन मेगाब्लॉक देण्यात येणार आहेत.

याच पुलाला समांतर आणखी एका नव्या (तिसऱ्या) पुलाला एमएसआरडीसीने मंजुरी दिली असून त्याच्याही कामाला सुरुवात झाली आहे. या पुलाच्या गर्डरचे कामही हैदराबाद येथे सुरू असून हा तिसरा पुल जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले. 

पूल तोडण्याची वर्षपूर्ती
मुंबईतील पूल दुर्घटनांनंतर राज्यातील धोकादायक पुलांचा प्रश्‍न ऐरणीवर आला. त्यानंतर कल्याण पूर्व-पश्‍चिमेला जोडणारा जुना पत्रिपूल सुरक्षेच्या कारणास्तव एक वर्षापूर्वी 18 नोव्हेंबर 2018 रोजी तातडीने पाडण्यात आला. या जागी नव्या पुलाचे काम तातडीने सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला होता. मात्र, एप्रिलपासून या पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com