नदी प्रदूषणासाठी वेगळ्या समितीची स्थापना, पाहणी दौरा सुरू

kalyan
kalyan

कल्याण : उल्हास आणि वालधुनी नदीमधील प्रदूषणाच्या कारणांची पाहणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या परिसराचा पाहणी दौरा केला. दोन दिवस चाललेल्या या दौर्‍यात नदीकाठावरील स्थानिक स्वराज्य संस्थांनी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याबाबत न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नुसार काम केले आहे का? याची प्रामुख्याने पाहणी करण्यात आली.

या शिवाय नदी प्रदूषणामागे अन्य कोणती कारणे आहेत का? याचाही शोध घेण्यात येत आहे. या समितीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नीरी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच वनशक्ती या सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

कल्याण-डोंबिवली शहरांमधून 216 दशलक्ष लिटर सांडपाणी सोडले जाते. या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिका प्रशासनाने पुरेशी व्यवस्था न केल्याने अवघ्या 40 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया होते. डिसेंबर 2018 पर्यंत पालिका आठ रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणार होती. तशा आशयाचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादरही करण्यात आले होते; मात्र विविध कारणांनी ही प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे वनशक्तीने न्यायालयाच्या निदर्शनास आणले होते. बदलापूर, अंबरनाथ तसेच उल्हासनगर या ठिकाणी अवस्थाही फारशी वेगळी नसल्याचे या पाहणीत आढळून आले. बदलापूर शहरात 25 दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते यातील 22 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते. उल्हासनगर शहरात सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणतीही सुविधा अद्याप उभी करण्यात आले नसल्याचे वास्तव या पाहणीत समोर आले आहे.

ही समिती दर पंधरा दिवसांनी अशा प्रकारची पाहणी करणार आहे जुलैमध्ये होणाऱ्या सुनावणीदरम्यान या पाहणीचे निष्कर्ष न्यायालयात सादर केले जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com