कामगार कायद्यातील बदल कामगारांच्या हिताविरुद्ध

कामगार कायद्यातील बदल कामगारांच्या हिताविरुद्ध

शिवडी - कामगारांची गळचेपी करण्यासाठी व्यावसायिकीकरणाच्या नावाखाली मोदी सरकारने कामगार कायद्याच्या काही तरतुदींमध्ये महत्त्वाचे बदल केले. हा बदल कामगारांच्या हिताविरोधात असल्याची टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त एल्फिन्स्टन येथील कामगार क्रीडा भवनात २९ व्या कामगार भव्य मेळावा व पद्मभूषण वसंत दादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचा महाराष्ट्राला घडविण्यात सर्वांत मोठा वाटा आहे. त्यांना न्याय मिळवून देण्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. महाराष्ट्रातील नऊ हजार ५०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यांना न्याय हवा आहे. हे सरकार त्यांच्याकडे पाहण्यास तयार नाही. बहुसंख्य मतांच्या जोरावर कायद्यात बदल करायचे हा मनमानी कारभार चालू आहे. या जुलमी सरकारविरोधात संघर्ष करू, असा इशारा चव्हाण यांनी या वेळी दिला. ‘मन की बात’ करणारे हे मोदी सरकार ‘जन की बात’ कधी करणार, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

हे सरकार कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकाचे नाही हे कामगारांनो लक्षात ठेवा आणि एकजुटीने राहा तरच कामगारांचा लढा यशस्वी होईल, असा सल्ला उपस्थित कामगारांना आमदार भाई जगताप यांनी दिला. या वेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सरचिटणीस मोहन प्रकाश, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे उपस्थित होते. ४० वर्षांहून अधिक काळ एकनिष्ठेने काम केलेल्या दोन कामगारांचा या वेळी अशोक चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भीष्माचार्य पुरस्काराने कामगार उत्कर्ष सभा संस्थापक सरचिटणीस विजय कांबळे; तर द्रोणाचार्य पुरस्काराने डाक टेलिग्राफ दूरध्वनी आंतरराष्ट्रीय युनियन व परिमंडळ सचिव राष्ट्रीय समन्वयक अशोक कौशिक यांना गौरवण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com