
राज्यपालांना 162 आमदारांच्या सह्यांचे पत्र देण्यात आले. हे पत्र आज सगळीकडे व्हायरल झालं आहे. या पत्रावर राज्यपाल भगतसिंह कोशियारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई : राज्यात सत्तास्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी राज्यपालांकडे केला. राज्यपालांना 162 आमदारांच्या सह्यांचे पत्र देण्यात आले. हे पत्र आज सगळीकडे व्हायरल झालं आहे. या पत्रावर राज्यपाल भगतसिंह कोशियारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला. त्या वेळी राज्यपाल राजभवनावर नव्हते. त्यामुळे या तिन्ही नेत्यांनी राजभवनाच्या अधिकाऱ्यांकडे पत्र सुपूर्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे ते बहुमत सिद्ध करू शकत नाहीत. फडणवीस बहुमत सिद्ध करण्यास असमर्थ ठरल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहोत, असे पत्रात नमूद केले आहे.
राज्यपालांनी आम्हाला अनुमती दिल्यास आम्ही आमदारांची ओळखपरेड घडवून आणू शकतो, अशी माहिती जयंत पाटील यांनी या वेळी दिली.