मुंबई - आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला एकाकी पाडण्याची राजकीय खेळी सुरू आहे.
भाजपच्या मित्रपक्षाचे कार्यकर्ते कमालीचे नाराज असून, स्वपक्षाचे अस्तित्व कायम राहावे, यासाठी इतर पक्षांसोबत सन्मानाची आघाडी करण्याचा सूर त्यांनी लावला आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांत भाजपविरहित आघाड्यांचा नवा "पॅटर्न' सुरू होईल, अशी चिन्हे दिसत आहेत.
भाजपसोबत महादेव जानकर यांचा राष्ट्रीय स्वाभिमानी पक्ष, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, तर विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटन मित्रपक्ष सत्तेत आहेत. मात्र या तीनही पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. सत्तेत सहभाग असला, तरी कार्यकर्त्यांना मात्र सावत्रभावाची वागणूक भाजपचे नेते देत असल्याची त्यांची तक्रार आहे.
वारंवार पक्षाच्या नेत्यांना सांगूनही फरक पडत नसल्याने कार्यकर्त्यांनीच आगामी निवडणुकांत भाजप विरोधात इतर पक्षांसोबत आघाडी करण्याची तयारी सुरू केली आहे. सदाभाऊ खोत व राजू शेट्टी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र आहे. सदाभाऊ खोत व मुख्यमंत्र्याची वाढती जवळीक यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. तर महादेव जानकर यांच्या पक्षातील प्रमुख 30 ते 35 पदाधिकाऱ्यांनी पक्षापासूनच फारकत घेत जानकर यांनाच आव्हान देण्याची तयारी केली आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे हेच भाजपच्या राजकीय कुरघोडीने त्रस्त झाले असून, सरकार विरोधात त्यांची नाराजी वाढली आहे. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांत या मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांत भाजपचे स्थानिक नेतृत्व निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेत नाही. केवळ मतांच्या बेरजेचे राजकारण होत असल्याने या मित्रपक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांत या मित्रपक्षाचे अस्तित्वच धोक्यात आल्याने आता झेडपी व पंचायत समित्यामध्ये भाजपने गृहीत धरू नये, अशी भूमिका वाढीस लागली आहे. त्यासाठी भाजपला एकाकी पाडून इतर पक्षांसोबत आघाडी करतानाच अनेक ठिकाणी स्वबळावरही जागा लढवण्याचा निर्णय भाजपचे मित्रपक्ष घेतील, असा दावा करण्यात येत आहे.
|