Loksabha 2019 : उमेदवारीचा घोळ संपेना; मरगळ हटेना

Loksabha-Election
Loksabha-Election

मुंबई - लोकसभेची आचारसंहिता घोषित होऊन अडीच आठवडे उलटले, तरी शिवसेना वगळता प्रमुख राजकीय पक्षांत उमेदवार निश्‍चितीचा घोळ अद्याप कायम आहे. निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेणाऱ्या भाजपमध्ये माढा आणि ईशान्य मुंबईच्या उमेदवाराचा तिढा सुटलेला नाही. महाआघाडीचा सांगली, पुणे आणि रावेरचा उमेदवार गुलदस्तात आहे. पाच मतदारसंघांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अजून प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे आणखी काही दिवस उमेदवारांच्या नावाची घोषणा लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांतील मरगळ हटत नसल्याचे चित्र आहे.

राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी २५ जागांवर, तर शिवसेनेने २३ जागांवर लढण्याचे जाहीर केले आहे. भाजपने २३ उमेदवार घोषित केले आहेत. परंतु, ईशान्य मुंबई आणि माढा मतदारसंघातील उमेदवाराबाबत भाजपने निर्णय घेतलेला नाही. ईशान्य मुंबईत विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी देण्यास शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, मुंबई महापालिकेतील गटनेते मनोज कोटक, अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रवीण छेडा यांच्या नावाची चर्चा आहे. ईशान्य मुंबईप्रमाणे माढातील उमेदवार निश्‍चितीचे घोंगडे भिजत पडले आहे. माढातून उमेदवारी मिळावी म्हणून खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही भाजपचा झेंडा हातात घेतला. दोन रणजितसिंहांपैकी कुणाला उमेदवारी द्यायची? असा प्रश्न भाजपसमोर आहे. याशिवाय माढा मतदारसंघासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि त्यांचे चिरंजीव रोहन यांचेही नाव चर्चेत आहे.

काँग्रेस महाआघाडीत जागावाटप निश्‍चित झाले आहे. महाआघाडीने चार जागा मित्र पक्षाला सोडल्या आहेत. उर्वरित ४४  पैकी काँग्रेस २४,  तर राष्ट्रवादी काँग्रेस २० जागा लढविणार आहे. काँग्रेसने बहुतांश उमेदवार जाहीर केले असले, तरी पुणे, सांगली आणि उत्तर मुंबईच्या उमेदवाराचा पेच कायम आहे. पुण्यातून संजय काकडे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, त्यांनी भाजपमध्ये राहण्याचे ठरविल्याने काँग्रेस पुण्यात उमेदवाराच्या शोधात आहे. सांगलीची जागा खासदार राजू शेट्टी यांना सोडायची की नाही, यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. उत्तर मुंबईतून मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी पळ काढल्याने तेथे अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांचे नाव चर्चेत आहे. परंतु, काँग्रेसने अजून ऊर्मिला यांचे नाव जाहीर केलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने रावेर वगळता सर्वच मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com