Crime News : देशातील 8.87% गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्रात; मुंबईत 27% गुन्ह्यात वाढ.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra 8 percent crimes in 27 percent increase crime in Mumbai police

Crime News : देशातील 8.87% गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्रात; मुंबईत 27% गुन्ह्यात वाढ...

मुंबई : राज्याच्या गृह विभागाच्या अर्थसंकल्पाचे विश्लेषण करणारा अहवाल समर्थन अध्ययन केंद्र या संस्थेने जारी केला आहे. देशात गुन्ह्यांच्या नोंदणीत राज्यांच्या यादीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असल्याचे नुकत्याच समर्थन केंद्र या संस्थेने जारी करण्यात आलेल्या अर्थसंकल्पिय अहवालाच्या आकडेवारीत समोर आले आहे.

2021 मध्ये भारतीय दंड संहिता अंतर्गत सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची देशात सर्वाधिक 540800 प्रकरणे महाराष्ट्रात नोंदली गेल्याची माहिती गृह विभागाच्या अर्थ संकल्पिय अहवालात समोर आली आहे.

देशातील 8.87% गुन्हे महाराष्ट्रात

महाराष्ट्रात सन 2021 मध्ये 5 लाख 40 हजार 800 गुन्ह्यांची नोंद झाली असल्याचे अहवालात म्हंटले आहे.सन 2021 मध्ये भारतात 60 लाख 96 हजार 310 गुन्हे नोंदवले गेले असून, नोंदविलेल्या एकूण गुन्ह्यांमध्ये 1.

तामिळनाडू 7 लाख 56 हजार 753, 2.गुजरात 7 लाख 31 हजार 738, 3. उत्तर प्रदेश- 6 लाख 8 हजार 82, तर 4. महाराष्ट्र 5. लाख 30 हजार 800 इतके गुन्हे दाखल झाले असून महाराष्ट्र ४ थ्या क्रमांकावर आहे. भारतात एकूण घडलेल्या 60 लाख 96 हजार 310 गुन्ह्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील गुन्ह्यांचे प्रमाण 8.87% आहे.

मुंबईत 27% गुन्ह्यात वाढ

अहवालानुसार 2021 मध्ये मुंबई शहरात विविध अशा 63689 गुन्ह्याची नोंद झाली. सर्वात जास्त देशाच्या राजधानीत 2.89 लाख गुन्ह्यांच्या घटना नोंदवल्या गेल्या. मुंबईत दररोज सरासरीने किमान 174 विविध प्रकारचे गुन्हेगारी गुन्हे आयपीसी कलमांतर्गत नोंदवले गेले, आकडेवारीनुसार 2019 आणि 2020च्या तुलनेत 2021 मुंबईत गुन्हेगारीत 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

महिला विरोधी गुन्ह्यात राज्य तिसऱ्या क्रमांकावर

समर्थन संस्थेच्या अहवालातील आकडेवारीनुसार 2021 या वर्षी देशातील महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार 2021 या वर्षी महिलांविरुद्ध एकूण 428278 गुन्हे नोंदवले गेले त्यापैकी उत्तर प्रदेशात सर्वाधिक 56083 गुन्हे नोंदवले गेले, त्यानंतर राजस्थान 40738 आणि महाराष्ट्र 39526 आहेत.

सरासरी पाहता महराष्ट्रात रोज 112 महिला विरोधात अत्याचाराच्या घटनांची नोंद 2021 मध्ये करण्यात आली महानगरांच्या बाबतीत, दिल्ली 3948 नोंदणीकृत गुन्ह्यासह आघाडीवर आहे, त्यानंतर मुंबई 1103 आणि बेंगळुरू 578 आहे

पोलिसांवरील वाढता ताण

महाराष्ट्रात 1 लाख लोकसंख्येमागे केवळ 169 पोलीस महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या अंदाजित 12 कोटी 49 लाख एवढी असून 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यात प्रत्यक्ष पोलीस संख्याबळ 1 लाख 87 हजार 931 आहे. म्हणजेच एक लाख लोकसंख्येसाठी 169 पोलीस आहेत. महाराष्ट्रात महिला पोलिसांची संख्या 31 हजार 233 इतकी असून एकूण पोलीस संख्याबळाच्या तुलनेत ही संख्या 16.61% इतकी आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची आवश्यकता आहे.

आकडेवारी प्रमाणे गेल्या वर्षी मुंबईत 7,820 चोरीच्या घटनांची नोंद झाली. याच कालावधीत फसवणूकीचे 4899 रॅश ड्रायव्हिंगचे गुन्हे 2282 अपहरण संबंधित गुन्हे लैंगिक छळ(1590) बलात्काराचे 364 तर दंगलीचे 303 आणि खूनाच्या 162 प्रकरणाची नोंद मुंबईत झाल्याचे अहवालात समोर आले

अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या गुन्ह्यांच्या बाबतीत मुंबई यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2021 मध्ये मुंबईत अल्पवयीन मुलांनी केलेल्या 611 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे, ज्यात चोरी आणि मारहाणीच्या अनेक प्रकरणांचा समावेश आहे,

आकडेवारीनुसार 2021 मध्ये महिलांशी विनयभंग केल्याचे सर्वात जास्त 14853 प्रकरणे ओडिशा राज्यात नोंदवली तर महाराष्ट्र 10568 प्रकरणांसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर उत्तर प्रदेश 939 आहे. महिलांशी विनयभंग केल्याचे सर्वात जास्त 2022 प्रकरणे दिल्लीत नोंदवली . याच काळात मुंबईत 1625 पाठोपाठ जयपूर मध्ये 586 गुन्हे दाखल करण्यात आहेत.

आकडवारी नुसार राज्यात गुन्ह्यांची नोंद सर्वात जास्त होते हे खरं जरी असलं तरी पण याकडे एक सकारात्मक दृष्टीने पहावे लागेल कारण गुन्हे घडले तर त्याची नोंद केली जातेकाही राज्यात गुन्ह्यांची नोंद सुद्धा होत नाही असे पाहायला मिळाले आहे.महाराष्ट्र पोलीस दल हे एक प्रोफेशनल दल आहे

- पी के जैन माजी आयपीएस अधिकारी

गुन्ह्यांच्या नोंदणीचा प्रमाण वाढलं आहे याचा अर्थ गुन्हेगारी निश्चित वाढली आहे . परंतु बरेचसे गुन्हे हे राजकीय आणि वैयक्तिक वैमानस्यांमुळे नोंदवले जातात त्यामुळे असे किती गुन्हे नोंदवले गेले याचा विश्लेषण होणे सुद्धा गरजेचं आहे.

- धनराज वंजारी माजी पोलीस अधिकारी