भ्रष्टाचार, अपयश दडविण्याचा प्रयत्न - अशोक चव्हाण

Ashok-Chavan
Ashok-Chavan

मुंबई - राज्य सरकारने मंत्रिमंडळात केलेले फेरबदल म्हणजे भ्रष्टाचार आणि मागील साडेचार वर्षांतील अपयश दडपण्याचा प्रयत्न असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. 

मंत्रिमंडळ फेरबदलांसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, प्रकाश महेता आणि इतर मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सरकार अडचणीत आले आहे. लोकायुक्त आणि न्यायालयांनी मंत्र्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, या मंत्र्यांवर कोणतीही कारवाई करायची मुख्यमंत्र्यांची तयारी नाही. त्यामुळेच महेता यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्याऐवजी त्यांना केवळ मंत्रिमंडळातून बाजूला सारून या प्रकरणावर पडदा पाडण्याचा भाजप-शिवसेनेचा खटाटोप सुरू आहे. सरकारने कितीही प्रयत्न केले तरी ते भ्रष्टाचाराचे आपले पाप लपवू शकणार नाही, असा इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला. 

हे फेरबदल निरर्थक असल्याची जाणीव कदाचित शिवसेना पक्षप्रमुखांनाही झाली असावी. त्यामुळेच त्यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याऐवजी प्रभू रामचंद्रांच्या चरणाशी जाण्यास प्राधान्य दिले असावे, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.

फेरबदलांमध्ये विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेल्यांचाही समावेश करताना लोकशाहीच्या संकेतांचे उल्लंघन झाल्याची टीका त्यांनी केली. आमदार नसलेले मंत्री सरकारचा कार्यकाळ संपेपर्यंत कोणत्याही सभागृहाचे सदस्य होऊ शकणार नाहीत, ही वास्तविकता आहे. तरीही केवळ राजकीय सोयीसाठी आणि तोडफोडीच्या राजकारणासाठी अशा अनेकांना मंत्री करण्यात आले. हा प्रकार लोकशाही परंपरेचे उल्लंघन करणारा असल्याची टीका चव्हाण यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com