मुंबई - राज्यातील सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्यासाठी महिनाभरात मराठी शिक्षण कायदा जारी करण्याचा वटहुकूम काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. आज महिना उलटला तरी या वटहुकमाची अंमलबजावणी झाली नाही, या वटहुकमाची अंमलबजावणी कधी करणार?, असा सवाल महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक श्रीपाद जोशी यांनी उपस्थित केला आहे.
जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याबाबत विचारणा केली आहे. 24 जूनला मराठी शिक्षण कायदा, मराठी भाषा भवन, मराठी शाळांचे सक्षमीकरण अशा विविध मागण्यांसाठी "मराठीच्या भल्यासाठी' या व्यासपीठाद्वारे आंदोलन झाले. या आंदोलनानंतर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महिनाभरात मराठी सक्तीचा वटहुकूम काढण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.
|