मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका : प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट 

File photo of Prakash Ambedkar
File photo of Prakash Ambedkar

मुंबई : राज्यात कट्टर हिंदुत्ववादी संघटनांवर कोणतेही नियंत्रण राहिले नाही. सोशल मीडियात काही कट्टरतावादी युवकांची भाषा पाहिली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीविताला धोका आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. रावसाहेब पाटील या युवकाचा दाखला देत आंबेडकर यांनी हा आरोप केला आहे. 

भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी सरकारने घेतलेल्या भूमिकेवर संताप व्यक्‍त करताना रावसाहेब पाटील या युवकाने फेसबुकवर देवेंद्र फडणवीस, गिरीश बापट व सुधींद्र कुलकर्णी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्‍तव्य केले आहे. याबाबतचे पुरावे सादर करत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भीमा कोरेगाव प्रकरणानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. दलितांच्या विरोधात या संघटनांच्या पाठीराख्यांनी आक्रमक भाषा व भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर तातडीने कारवाई करायला हवी. 

भीमा कोरेगावला 1 जानेवारीला लाखो दलित बांधव जमा होणार असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना कळवली नाही. त्यामुळे या सर्व संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली. 

सध्या देशभरात हिंदुत्वावरून विविध संघटनांमध्ये स्पर्धा सुरू आहे. कोण अधिक कट्टर हिंदुत्ववादी यासाठी चढाओढ लागली आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या संघटना स्वत:चा कट्टरतावाद सिद्ध करण्यासाठी व्यक्‍ती व नेत्यांना मारण्याची भाषा करत आहेत. त्यांच्या चढाओढीच्या स्पर्धेत कोणाचाही जीव गमवावा लागू नये यासाठी अशा सर्व संघटनांवर कारवाई करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com