नवी मुंबई - सकल मराठा समाजाने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनातून नवी मुंबई सकल मराठा समाजाने माघार घेतल्यामुळे नवी मुंबईत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. नवी मुंबई पोलिसांनी घेतलेल्या विशेष खबरदारीमुळे कोपरखैरणे शांत होते. नवी मुंबईत एका गटाने आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे आंदोलनाच्या पवित्र्यात असणाऱ्या 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे नवी मुंबई शहरातील दुकाने सुरू होती; मात्र 25 जुलैच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र भीतीचे सावट होते. तातडीचे काम नसेल, तर अनेकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले. त्यामुळे रस्ते आणि बाजारांमध्ये शुकशुकाट होता. खासगी आणि महापालिका शाळा बंद असल्यामुळे पालकांनीही मुलांना शाळेत पाठवले नाही. कोपरखैरणेत पुन्हा आंदोलन भडकू नये यासाठी पोलिसांकडून आठवडाभर दोन्ही गटांतील पदाधिकाऱ्यांना शांत बसण्याचे आवाहन करण्यात येत होते. आंदोलनाच्या तयारीत असलेल्या गटाच्या नेत्यांवर पोलिसांनी रात्रीपासूनच नजर ठेवली होती. उपद्रव करणाऱ्या 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
कोपरखैरणेतील दोघांवर संभाव्य धोका लक्षात घेऊन कलम 151/1 नुसार कारवाई केल्याचे पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे यांनी सांगितले.
|