मुंबई - महत्त्वाकांक्षी मेट्रो-3 प्रकल्पासाठी झाडे कापण्यास दिलेली अंतरिम मनाई मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. या प्रकल्पासाठी तोडण्यात आलेल्या झाडांचे अन्यत्र पुनर्रोपण करण्यात येईल, असे न्यायालयात सांगण्यात आले. त्यावर बेसुमार झाडांची कत्तल सुरूच राहिल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होऊन दुसऱ्या ग्रहाचा शोध घ्यावा लागेल, असे न्यायालयाने सुनावले.
सीप्झ-कुलाबा मेट्रो या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मुंबई महापालिका आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने काम सुरू केले आहे. त्यासाठी पाच हजारांहून अधिक दुर्मिळ झाडे विनापरवाना तोडण्यात आली आहेत, असा आरोप करणाऱ्या दोन जनहित याचिका स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत. न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे याचिकांवर शुक्रवारी (ता. 24) सुनावणी झाली. महापालिका आणि महामंडळाने झाडे कापण्याच्या परवानगीसंबंधित कागदपत्रे याचिकादारांना दाखवावीत, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर होणार आहे. तोपर्यंत झाडे कापण्यावर दिलेली स्थगिती न्यायालयाने कायम ठेवली आहे. झाडे छाटणीबाबत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.
|