मेट्रो-३ ने गाठला १५ वा टप्पा 

file photo
file photo

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गातील आझाद मैदान ते मुंबई सेंट्रल हा ३.८१४ किलोमीटरचा बोगदा शुक्रवारी (ता. २) पूर्ण झाला. ‘वैतरणा-१’ या यंत्राद्वारे केवळ २० महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात आले.

आझाद मैदान ते मुंबई सेंट्रल हा ‘डाऊन’ दिशेकडील बोगदा पूर्ण करणारे मेट्रो-३ प्रकल्पातील ‘वैतरणा-१’ हे पहिले ‘टीबीएम’ (टनेल बोअरिंग मशीन) ठरले आहे. जमिनीच्या २० मीटरखाली बेसाल्ट आणि ब्रेसिया या कठीण दगडातून खोदकाम करत हा पल्ला गाठण्यात आला. या कामासाठी २७२० ‘सेगमेंट रिंग’ वापरण्यात आल्याची माहिती मेट्रो-३ च्या वतीने देण्यात आली. या मार्गातील हा १५ वा टप्पा आहे.

मेट्रो-३ भुयारी मार्गाचे काम वेळापत्रकानुसार आणि वेगात सुरू आहे. या भुयारीकरणादरम्यान अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, या मार्गात १४ उंच इमारती, २८ ऐतिहासिक वारसा वास्तू आणि अत्यंत जुन्या इमारती आहेत. त्यापैकी एकाही वास्तूची कसल्याही प्रकारची हानी न होता हे आव्हानात्मक काम पूर्ण करण्यात आले.

‘वैतरणा-१’ची कामगिरी 
मेट्रो-३ मार्गाच्या ३१ किलोमीटर भुयारीकरणासाठी १७ महाकाय बोगदा खोदकाम यंत्रांचा (टीबीएम) वापर करण्यात आला आहे. मेट्रो-३ मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानक, मुंबई सेंट्रल एसटी व बेस्ट आगार, मुंबई सेंट्रल आणि मरिन लाईन्स या लोकल स्थानकांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोईस्कर ठरणार आहे.

भुयारीकरणाचे काम अतिशय आव्हानात्मक होते. या मार्गातील ऐतिहासिक इमारतींच्या पायाला धक्का न लागता काम पूर्ण 
झाले आहे.
- अश्‍विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन

मेट्रोचे तिकीटदर तूर्तास ‘जैसे थे’
मेट्रो रेल्वेचे तिकीट दर वाढवण्याच्या मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्या मागणीबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. दरम्यान, मेट्रोचे तिकीट दर तूर्तास ‘जैसे थे’ राहणार आहेत. केंद्र सरकारच्या समितीने मेट्रोचे तिकीट दर कमी करण्याची शिफारस केली आहे. त्याविरोधात मेट्रो वन कंपनीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी मुख्य न्यायाधीश प्रदीप नंदराजोग आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे झाली. नोव्हेंबर २०१८ मध्ये तिकीट दरांचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल दिला आहे. या समितीने तिकिटांचे दर कमी करण्याची शिफारस केली आहे. घाटकोपर ते वर्सोवा मार्गावरील वेगवेगळ्या स्थानकांदरम्यानच्या प्रवासासाठी १०, २०, ३० आणि ४० रुपये असे तिकीट दर सुचवण्यात आलेले आहेत. हे तिकीट दर अत्यंत कमी असून, दिल्ली मेट्रोच्या तुलनेत नगण्य आहेत. त्यामुळे या दरनिश्‍चितीला स्थगिती देण्याची मागणी मेट्रो वन कंपनीने केली आहे. राज्य सरकारने याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश खंडपीठाने दिले. या याचिकेवर सहा आठवड्यांनी सुनावणी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com