भारत 'आयसीयू'मध्ये, निवडणुकीनंतरच शुद्धीवर येईल : राज

भारत 'आयसीयू'मध्ये, निवडणुकीनंतरच शुद्धीवर येईल : राज

मुंबई : भारत 'आयसीयू'त, तो आता निवडणुकीनंतरच शुद्धीवर येईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यांनी आपल्या नव्या व्यंगचित्राच्या माध्यमातून सांगितले आहे. राज यांनी आज (सोमवार) त्यांचे नवे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. गेल्या साडे चार वर्षात भारतावर खूपच अत्याचार झाल्याने तो आयसीयूत पोहोचला, असल्याची टीका त्यांनी नेहमीप्रमाणेच खास आपल्या शैलीतून केली आहे.
 

राज ठाकरेंनी या व्यंगचित्रात धन्वंतरीचे चित्र रेखाटले आहे. यात आयसीयूमध्ये भारताला दाखवण्यात आले आहे. धन्वंतरी आयसीयूबाहेर जमलेल्या लोकांना उद्देशून सांगतात, 'काळजीचे कारण नाही. गेल्या साडे चार वर्षात भारतावर खूप अत्याचार झालेत. लोकसभा निवडणुकीनंतर शुद्धीवर येईल. साडेचार वर्षाचा उल्लेख करताना राज ठाकरे यांचा रोख मात्र सरकारकडेच आहे. एकूणच, भारत या साडेचार वर्षात आयसीयूमध्ये जाण्यासाठी भाजप सरकारच कारणीभूत असल्याचे राज यांना या व्यंगचित्रातून सांगायचे आहे.
 

दिवाळीचं औचित्य साधून व्यंगचित्राची मालिका घेऊन येणार असल्याचे रविवारी ट्विटरवरुन त्यांनी जाहीर केले होते. या मालिकेतील पहिलं व्यंगचित्र त्यांनी धनत्रयोदशीनिमित्त रेखाटले आहे. आज (ता. 05) सकाळी त्यांनी हे व्यंगचित्र सोशल मिडीयावर पोस्ट केले आहे. धनत्रयोदिवशी हा दिवस अनेक प्रकारे साजरा केला जातो. वैद्यकीय शास्त्राचा देव धन्वंतरी ह्याचा जन्मदिवस म्हणूनही काही लोक हा दिवस महत्त्वाचा मानतात, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com